राज्यातील सर्व शहरांतील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार असून या माध्यमातून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी वैद्यकीय सेवा, विमा संरक्षण याबरोबरच चालकांच्या मुलांच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लागावा म्हणून शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे.रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी काही कल्याणकारी योजना राबविण्याचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन कामगार आयुक्त मधुकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या शिफारशी राज्य शासनाने स्वीकारल्या असून त्यानुसार रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे व त्याअंतर्गत त्यांना विमा संरक्षण, वैद्यकीय सुविधा व अन्य काही कल्याणकारी योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती कामगार मंत्री भास्कर जाधव यांनी दिली. मंडळात नोंदणी करणाऱ्या चालकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर मंडळ स्थापण्याची कार्यवाही सुरू केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले.