वारंवार इशारा देऊनही शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे उसाचे पैसे न देणाऱ्या खासगी व सहकारी साखर कारखान्यांवर सहकार विभागाने कारवाई सुरू केली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सहा कारखान्यांकडून ११६ कोटी ५८ लाख ३२ हजार रुपये दंड वसूल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आठ कारखान्यांचे गाळप परवाने निलंबित, तर सहा कारखान्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची थकीत देणी भागविण्यासाठी पाच कारखान्यांची मालमत्ता जप्त करून ६७ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ऊस गाळप हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे द्यावेत, असे सहकार विभागाने सर्वच सहकारी व खासगी साखर कारखान्यांना बजावले होते. मात्र बहुतांश साखर कारखाने राजकारण्यांचेच असल्याने, सरकारदरबारी कारखान्याच्या अडचणी मांडून एफआरपीच्या अटीतून सुटका करून घेण्याचाही प्रयत्न झाला. राज्य सरकारने ही अट कायम ठेवली, परंतु व्याज सवलतीचे दीर्घ मुदतीचे साखर कारखान्यांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला. तरीही २५ कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे सहकार विभागाला अशा कारखान्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यतील दोन, सांगली जिल्ह्यतील दोन, सोलापूर व औरंगाबाद जिल्ह्यंतील प्रत्येकी एक अशा सहा साखर कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिलेली आहे व गाळप परवानाही घेतलेला नाही. त्यामुळे प्रति टन, प्रति दिन ५०० रुपयांप्रमाणे या कारखान्यांवर दंड आकारणी केली आहे. त्यानुसार या सहा कारखान्यांकडून ११६ कोटी ५८ लाख ३२ हजार रुपये वसूल करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दंडाच्या वसुलीसाठी जप्तीचे आदेश दिलेले कारखाने सोलापूर जिल्ह्यतील आदिनाथ, कुर्मदास, शिवरत्न विजय शुगर, सांगली जिल्ह्यतील वसंतदादा शेतकरी, जळगाव जिल्ह्यतील चोपडा. गाळप परवाना कायमचा रद्द केलेले कारखाने : कोल्हापूर जिल्ह्यतील तात्यासाहेब कोरे वारणा, पंचगंगा, उदयसिंह गायकवाड, सांगली जिल्ह्यतील यशवंत- खानापूर, माणगंगा, सोलापूर जिल्ह्यतील शंकर व औरंगाबाद जिल्ह्यतील सिद्धेश्वर. गाळप परवाना निलंबित केलेले कारखाने : पुणे जिल्ह्यतील राजगड, सांगली जिल्ह्यतील महांकाली, सातारा जिल्ह्यतील श्रीराम जवाहर, न्यू फलटण, जालना जिल्ह्यतील समर्थ, सागर, परभणीतील महाराष्ट्र शेतकरी, यवतमाळतील वसंत पुसद. मालमत्ता जप्तीचे आदेश वसंतदादा सहकारी साखर कारखाना, सांगली, आदिनाथ सहकारी साखर कारखाना, कुर्मदास साखर कारखाना, विजय शुगर्स, सोलापूर व चोपडा सहकारी साखर कारखाना, जळगाव या कारखान्यांची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची ६७ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये इतकी थकीत रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.