मढ आणि वर्सोवा परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महानगरपालिकेकडून मढ जेट्टी ते वर्सोवा- कोळीवाडय़ाला जोडणारा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तीन पर्यायही सुचविण्यात आले आहेत. त्यामुळे त्या तीन पर्यायांपैकी एका पर्यायाची तातडीने निवड करण्याच्या सूचना महापौर सुनिल प्रभू यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी २२ किलोमीटर लांबचा फेरा मारून अंधेरीला जावे लागते. तसेच या प्रवासासाठी या ठिकाणी बोटीचाही वापर करावा लागतो़ परंतु पावसाळ्यात बोटीने प्रवास करणे जोखमीचे
असते त्यामुळे महापालिकेने याठिकाणी सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून पहिल्यांदाच असा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे. त्यामुळे सुचविण्यात आलेल्या पर्यायांची निवड करून त्यावर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना शनिवारी प्रभू यांनी प्रशासनाला दिल्या़