सरत्या वर्षांचा संपूर्ण शेवटचा आठवडा सहकुटुंब घरापासून दूर पळायचे आणि आपल्या आवडत्या ठिकाणी ३१ डिसेंबरची रात्र जागवत नवीन वर्षांचे स्वागत करायचे ही प्रथाच पडली आहे. युरोप-अमेरिकावारीचे दर वाढलेले असल्याने परदेशी जाण्यास उत्सुक पर्यटकांनी थायलंड, सिंगापूर, बँकॉक या स्वस्तात मस्त अशा देशांना पसंती दिली आहे. तर नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आजही पर्यटकांची पहिली पसंती देशात गोव्याला आहे. तर महाराष्ट्राचा विचार करता कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, भंडारदरा अशा सर्वच प्रसिद्ध पर्यटनस्थळांवरील हॉटेल ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत.

नव्यावर्षांच्या स्वागतासाठी गोव्यानंतर अंदमान-निकोबार, केरळ बॅकवॉटर्स, सिक्कीम, मनाली, उटी, कूर्ग, गंगटोक, जयपूर या ठिकाणांना पर्यटक पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांत कोकण किनारपट्टीवरील तारकर्ली हे देशभरातील पर्यटकांच्या नकाशावर आले आहे. पर्यटकांची गर्दी वाढत आहे, अशी माहिती ‘हॉलिडे आयक्यू’चे संस्थापक हरी नायर यांनी दिली. कुटुंबामागे सरासरी ३५ हजारांचा खर्च येईल आणि सात ते आठ दिवसांची भ्रमंती होईल अशाच पॅकेजेसना या काळात मागणी असल्याचे हरी नायर त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) भंडारदरा, गणपतीपुळे, तारकर्ली, वेळणेश्वर, माथेरान, महाबळेश्वर, कार्ला, चिखलदरा, ताडोबा आणि पानशेत येथील सर्व रिसॉर्ट्स सहा महिने आधीच आरक्षित झाले आहेत, असे वरिष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे यांनी सांगितले.
नाताळ आणि नववर्षांचा जल्लोष खरेतर युरोप-अमेरिकेत जास्त पहायला मिळतो. पण, या कालावधीत तिथे जाणे हे खूप खर्चिक असते. तशात या काळात विमानप्रवासाचे दरही चढे असतात. त्यामुळे युरोपियन देशांऐवजी तुलनेने स्वस्त असलेल्या थायलंड आणि बँकाक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांकडे जास्त गर्दी होते, असे त्यांनी सांगितले. यावर्षीही तिथे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, अशी माहिती ‘ईशान्त इंटरनॅशनल टुर्स’चे जीतेंद्र गिरे यांनी दिली.