टायगर मेमन हा मुंबई बॉम्बस्फोट कटाचा एक मुख्य सूत्रधार. याकूब हा त्याचा भाऊ. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट. बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस आधीच मेमन बंधू त्यांच्या कुटुंबीयांसह दुबईला पळाले होते. तेथे काही दिवस ते राहिले. त्यानंतर त्यांना कराचीला हलविण्यात आले. याकूबची पत्नी राहिन हिच्या म्हणण्यानुसार ते कराचीत नदरकैदेतच होते. ही नजरकैद अर्थातच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची होती. त्या जाचाला कंटाळून ते भारतात आले. तिच्या मते याकूब १९ जुलै १९९४ मध्ये स्वत:हून भारतात आला. पण त्याला अटक करण्यात आल्याचे दाखविण्यात आले.
भारतीय गुप्तचर संस्था रॉचे तत्कालीन अधिकारी (अतिरिक्त सचिव, कॅबिनेट सचिवालय) बी. रमण यांच्या मते याकूब मेमनला रॉ, सीबीआय आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक भारतात आणले. खुद्द तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे या गुप्तचर मोहिमेवर लक्ष ठेवून होते. रमण यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका लेखामध्ये या मोहिमेबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार, त्याची आणि मेमन कुटुंबीयांतील काही जणांची शरण येण्याची इच्छा होती. त्यासंदर्भात सल्ला घेण्यासाठी तो कराचीहून गुपचूप काठमांडूला गेला होता. तेथे त्याला त्या वकिलाने आणि त्याच्या कुटुंबातील काही जणांनी शरण जाऊ नका, असे सांगितले. त्यांनी त्याला कराचीला परतण्याचा सल्ला दिला. मात्र तो कराचीच्या विमानात बसण्यापूर्वीच रॉच्या गुप्तचरांनी नेपाळ पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. तेथून त्याला एव्हिएशन रिसर्च सेंटरच्या विमानाने दिल्लीत आणण्यात आले आणि मग तेथे औपचारिकरीत्या त्याला अटक करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेचे समन्वयन रमण यांनीच केले होते. येथे आल्यानंतर याकूबने सुरक्षा यंत्रणांशी सहकार्य केले. मेमन कुटुंबीयांतील काही व्यक्तींना आयएसआयच्या तावडीतून सुटून भारतात येण्यासाठी त्यानेच तयार केले. त्या व्यक्ती तेथून दुबईला गेल्या आणि त्यांना तेथून इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेत सामील असलेल्यांना आरडीएक्स उपलब्ध करून देणे, बॉम्ब ठेवण्यासाठी वाहने पुरविणे, कटात सहभागी असलेल्यांना विमानाची तिकिटे काढून देणे अशा विविध गुन्हय़ांखाली २००७ मध्ये याकूबला सक्तमजुरी, जन्मठेप आणि फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याच्या एसा, युसुफ या भावांसह वहिनी रुबीना हिला जन्मठेपेची शिक्षा झाली असून, त्याचे वडील अब्दुल रझाक यांचे खटल्याचा निकाल येण्यापूर्वीच निधन झाले. आई हनिफा, याकूबची पत्नी राहिन, भाऊ सुलेमान यांची मात्र निर्दोष मुक्तता झाली असून, त्याचा भाऊ टायगर व अयुब तसेच त्यांचे कुटुंबीय फरार आहे.

आरोप आणि शिक्षा
फौजदारी कट – भारतीय दंड संहितेच्या कलम १२० ब नुसार फाशीची शिक्षा (दहशतवादी कारवायांसाठी मूलचंद शाह आणि भाऊ अयुबच्या नावे असलेल्या तेजरथ इंटरनॅशनल या कंपनीमार्फत आर्थिक पुरवठा आणि आरोपींना वाटप)
दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय मदत – टाडा कायदा कलम ३ नुसार जन्मठेप (बॉम्बस्फोटातील आरोपींच्या प्रशिक्षणासाठी त्यांना पाकिस्तानला पाठविण्यासाठी विमानप्रवासाची तिकिटांची व्यवस्था करणे तसेच पाकिस्तानात राहण्याची व्यवस्था करणे. बॉम्ब ठेवण्यासाठी वाहने पुरविणे)
शस्त्र बाळगणे तसेच स्फोटकांची बेकायदा वाहतूक – टाडा कायदा ५ व ६ नुसार १४ वर्षे सक्तमजुरी
जीवितास धोका होईल अशा रीतीने स्फोटके बाळगणे – स्फोटकविरोधी कायदा ३, ४ व ६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी

घटनाक्रम
’१२ मार्च १९९३- मुंबईमध्ये १३ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत २५७ मृत आणि ७१३ जण जखमी.
’१९ एप्रिल- ११७वा आरोपी अभिनेता संजय दत्तला अटक.
’४ नोव्हेंबर- १८९ आरोपींविरोधात दहा हजार पानी प्राथमिक आरोपपत्र दाखल.
’१९ नोव्हेंबर- सीबीआयकडे तपास सुपूर्द.
’१ एप्रिल १९९४- टाडा न्यायालयाचे ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात स्थलांतर.
’१० एप्रिल- सपाचे नेता अबू आझमींसह आणखी एक संशयित आरोपी आरोपमुक्त.
’१४ ऑक्टोबर- संजय दत्तला जामीन.
’ऑक्टोबर २०००- ६८४ साक्षीदारांची तपासणी.
’९ मार्च ते १८ जुलै २००१- आरोपींचे म्हणणे नमूद.
’९ ऑगस्ट ते १८ ऑक्टोबर- फिर्यादींकडून युक्तिवाद.
’९ नोव्हेंबर २००१ ते २२ ऑगस्ट २००२- बचाव पक्षाकडून युक्तिवाद.
’२० फेब्रुवारी २००३- दाऊदचा हस्तक एजाझ पठाण न्यायालयासमोर हजर.
’२० मार्च २००३- मुस्तफा डोसाला पोलीस कोठडी व सुनावणी वेगळी केली.
’१३ जून २००६- कुख्यात गुंड अबू सालेमवरील सुनावणी वेगळी केली.
’१० ऑगस्ट – १२ सप्टेंबरला निकाल देण्याची घोषणा.
’१२ सप्टेंबर- न्यायालयाच्या निकालात मेमन कुटुंबातील चौघे दोषी, तिघे दोषमुक्त. १२ आरोपींना फाशी आणि २० जणांना जन्मठेपेची शिक्षा.
’१ नोव्हेंबर २०११- सर्वोच्च न्यायालयात १०० आरोंपींची निर्णयाविरोधात व राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी सुरू.
’२९ ऑगस्ट २०१२- न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
’२१ मार्च २०१३ –  याकूब मेमनची फाशी कायम. उर्वरित १० जणांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तीत.
’३० जुलै- याकूबची पहिली फेरविचार याचिका फेटाळली.
’११ एप्रिल २०१४- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दया अर्ज फेटाळला.
’२१ जुलै २०१५- सर्वोच्च न्यायालयाने मेमनची सुधार याचिका फेटाळली.
’२९ जुलै- याकूबची फेरयाचिका पुन्हा न्यायालयाने फेटाळली.