भरधाव वेगातील गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे दहिसर-बोरिवली लिंक रोडवर घडली. या अपघातात तीन जण जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बोरिवली व कांदिवली येथे राहणारे भूपेंद्र वेलणकर (२८), कौस्तुभ धोत्रे (२९), अमित कांबळे (३०), नील रेवणकर (३०) आणि वैभव जाधव (२८) हे पाचही मित्र शनिवारी रात्री दहिसर येथील हॉटेलात पार्टी करण्यासाठी गेले होते. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास दहिसर बोरिवली लिंक रोडवरून परतत असताना सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाजवळ भूपेंद्रचे आय१० गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली गाडी रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका ट्रकला धडकली. ही धडक एवढी भयानक होती की भूपेंद्रच्या बाजूला बसलेल्या कौस्तुभ धोत्रेचा जागीच मृत्यू झाला. भूपेंद्रसह गाडीच्या मागील सीटवर बसलेले अमित, नील व वैभव हे गंभीर जखमी झाले. मात्र, भूपेंद्रचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य तिघांवर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातील उपचार सुरू आहेत. भूपेंद्र आणि कौस्तुभ यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यांनी मद्यापान केले होते का, ते स्पष्ट झालेले नाही.