उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यक्तीगत पातळीवर जवळ आहेतच आणि दोन्ही पक्षांमधील ही युती टिकावी यासाठीच वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले असे प्रतिपादन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केले आहे. तर मनोहर जोशी यांनी १०० व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि आम्हाला दोघांना बोलवावे असे सांगत फडणीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त दादरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनोहर जोशी यांच्या 'आयुष्य कसे जगावे?' या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी यांनी युती टिकवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला होता. आपल्या भाषणात मनोहर जोशींनी आत्मचरित्रात नेमके काय म्हटले आहे याची माहिती दिली. माझ्या पुस्तकात पाच भाग आहेत. पण हे आत्मचरित्र स्वतःचे कौतुक करण्यासाठी प्रकाशित केले नाही असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. मराठी माणसाला संबंध वाढवण्याचं कळत नाही. तो नोकरीच शोधत राहतो. पण आज माझ्या कोहिनूर टेक्निकलच्या ७९ शाखा असून या शाखांमध्ये दरवर्षी १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. कोहिनूर समुहाची तीन हॉटेल्स आहेत आणि आता चौथ्या हॉटेलचे काम पूर्ण होत आल्याचे सांगत मनोहर जोशींनी त्यांच्या कारकिर्दीचा लेखाजोखाच उपस्थितांसमोर मांडला. बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांशी नेहमीच नातलगासारखे वागले. बाळासाहेबांची परंपरा उद्धव ठाकरेंनी समृद्ध केली असेही त्यांनी नमूद केले. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमुळेच मुख्यमंत्रीपदी पोहोचू शकलो असे सांगत त्यांनी शिवसेनेचे आभार मानले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही एकाच मंचावर उपस्थित असल्याने ते काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढणे टाळले. उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशी यांच्या कामाचे कौतुक केले. तर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील युतीच्या काळात मनोहर जोशी यांनी समर्थपणे प्रत्येक आव्हानांचा सामना केला असे सांगत जोशी यांच्या कामाचा गौरव केला.