काही मूठभर लोकांना वेगळा विदर्भ हवा आहे. त्यांची इच्छा आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही. हे मूठभर लोक आईच्या पाठीवर नव्हे, तर कुशीवर वार करीत आहेत. महाराष्ट्रातील एक इंच भूमीही वेगळी होऊ देणार नाही. अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.मुंबईसह महाराष्ट्र शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेत येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत केले जाईल. संघटना वाढविण्याचे काम मी हाती घेतले आहे, असेही ते म्हणाले. तिसऱ्या आघाडीची वेळ येईल तेव्हा पाहू, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला. ‘बेस्ट’ उपक्रमाने मुंबईमधील ५२ बसमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन हे ५२ बसमार्ग शिवसेना कोणत्याही परिस्थितीत बंद करू देणार नाही. पालिकेतील रस्ते घोटाळ्याबद्दल बोलणे हे विरोधकांचे कामच आहे. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, असे सांगत त्यांनी या विषयाला बगल दिली.