जिथे प्रादेशिक पक्ष सक्षम आहेत तेथील जनता प्रादेशिक पक्षांनाच निवडून देण्याचा पर्याय निवडतात, हे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतून पुन्हा एकदा दिसून आले असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यापैकी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये तेथील मतदारांनी प्रादेशिक पक्षांवरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. जयललिता आणि ममता बॅनर्जी पुन्हा एकदा या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. या निकालांच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मतदार प्रादेशिक पक्षांनाच पसंती देतात, हे चांगले लक्षण आहे. पण या पक्षांची जबाबदारीही वाढली आहे. हे पक्ष आपल्यावरील जबाबदारी ओळखून वागतील, अशी अपेक्षा आहे. आसाममध्ये भाजपचे सरकार सत्तेवर येणार आहे. त्यामुळे तिथे आता बांगलादेशातून होणारी घुसखोरी थांबेल, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.