संगणक-साक्षरतेच्या जाचातून अभियांत्रिकी अध्यापकांच्या सुटकेची चिन्हे

व्हीजेटीआयसह राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही अध्यापकांना संगणक-साक्षरतेच्या (एमएससीआयटी) प्रमाणपत्र कोर्सच्या नियमाच्या सक्तीमधून वगळण्यात यावे अशी स्पष्ट शिफारस राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने केली आहे. अभियांत्रिकी अध्यापक हे संगणक-साक्षर असल्याचे प्रमाणपत्र मागणे हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करून याबाबतच्या शासकीय आदेशातून त्यांना वगळले जावे, असा प्रस्ताव संचालनालयाने पाठविल्यामुळे नोकरीवर टांगती तलवार असलेल्या पन्नासहून अधिक अध्यापकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

शासनाने २००३ साली शासकीय कर्मचाऱ्यांना ‘एमएससीआयटी’ करणे बंधनकारक केले. तसेच नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दोन वर्षांत संगणक-साक्षरतेचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले होते. माटुंगा येथील व्हीजेटीआयमध्ये एमटेक झालेल्या चौघा अध्यापकांना या निर्णयाचा फटका बसला. त्यांनी सेवेत दाखल झाल्यापासून दोन वर्षांत संगणक-साक्षरतेचे प्रमाणपत्र न घेतल्यामुळे त्यांना सेवामुक्त करावे असे आदेश दिले होते. याविरोधात विक्रम केहरी, अमी डपकावाला, महेंद्र थोरात आणि ज्योती गोंडाने यांनी तंत्रशिक्षण संचालक डॉ. महाजन यांना निवेदन सादर केले. २०१३ साली शासनाने काढलेल्या आदेशात अभियांत्रिकी अध्यापकांमधील संगणक-शिक्षण तसेच समकक्ष शिक्षण घेतलेल्यांना वगळण्यात आल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच अभियांत्रिकी पदवी घेतलेले व अध्यापनाचे काम करणारे संगणक जाणकार असल्यामुळे त्यांनाही वगळण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीचा विचार करून संचालक डॉ. महाजन यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमून एकूणच अभियांत्रिकी अध्यापकांना व अभियंत्यांना एमएससीआयटी लागू असावी की नसावी याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. सदर समितीने अभियांत्रिकी अध्यापक व अभियंते हे संगणक-साक्षर असल्यामुळे त्यांना शासकीय निर्णयाचे बंधन असू नये अशी शिफारस केली.

चार अध्यापकांचा लढा..

उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयातील संबंधित अधिकारी सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून याबाबतचा आदेश जारी करण्यासाठी पाठपुरावा करतील व त्यांनी नवीन आदेश  काढल्यानंतर या अध्यापकांच्या नोकरीवरील टांगती तलवार दूर होईल. व्हीजेटीआयच्या चौघा अध्यापकांनी दिलेल्या या लढय़ामुळे राज्यातील अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांनाही न्याय मिळणार असून व्हीजेटीआयचे संचालक डॉ. काकडे हे या लढय़ात चौघा अध्यापकांच्या मागे ठामपणे उभे राहिल्याचेही सूत्रांनी सांगितले.