विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेही लाट आली असून नागपूरमध्ये रविवारी तब्बल ४५.३ अंश से. तापमान नोंदले गेले. नागपूरसह अकोला व वर्धा येथेही तापमान ४५ अंश से. वर राहिले. उष्णतेच्या या लाटेचा प्रभाव सोमवारीही राहील. मराठवाडय़ात कमाल तापमान ४१ ते ४३ अंश से. दरम्यान होते. मुंबईत ३३.६ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली.
एप्रिलपासून दर आठवडय़ात राज्यातील मराठवाडा, विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटा येत आहेत. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील तापमान ४५ अंश से.च्या घरात गेले. सर्वच जिल्ह्य़ांमध्ये तापमान ४३ अंश से. च्या वर राहिले. नागपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. वर्धा व अकोला येथे ४५ अंश, चंद्रपूर व ब्रह्मपुरीमध्ये ४४ अंश से. तापमान होते.