चिपळूण साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या काव्य संमेलनास अध्यक्षा म्हणून उपस्थित राहण्यास कवयित्री प्रज्ञा पवार यांनी नकार दर्शवला आहे. संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या तसेच निमंत्रण पत्रिकेवर परशूराम यांचे व त्यांच्या कुऱ्हाडीचे चित्र छापण्याच्या  निर्णयाचा निषेध म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
संमेलनाच्या व्यासपीठास ठाकरे यांचे नाव देण्यास ज्येष्ठ समिक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी सर्वप्रथम आपला आक्षेप ‘लोकसत्ता’शी बोलताना नोंदवला होता.  त्या पाश्र्वभूमीवर प्रज्ञा पवार यांनी सोमवारी हा निर्णय जाहीर केला.
ठाकरे यांनी वसंत बापट, पु. ल. देशपांडे तसेच साहित्य संमेलनाबाबत अपमानकारक वक्तव्ये केली होती. संमेलन व्यासपीठाला ठाकरे यांचे नाव देण्याइतपत मराठी साहित्यात त्यांचे कोणते अमूल्य योगदान आहे, असा सवाल करून प्रज्ञा पवार म्हणाल्या की, त्यांची राजकीय भूमिकाही विद्वेषावर आधारित होती. त्यामुळे निषेध म्हणून मी निमंत्रितांच्या कवी संमेलनाला अध्यक्षा म्हणून न जाण्याचे ठरवले आहे.