भारताला एकविसाव्या शतकात प्रगत राष्ट्र म्हणून जगाला मार्गदर्शन करायचे असेल तर महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. जोपर्यंत देशाच्या विकासात महिलांचा सहभाग वाढवत नाही तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मराठी नववर्ष व चत्रपाडव्यानिमित्त गिरगावात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने नववर्ष संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गिरगावात १४ वर्षांपासून राष्ट्रभक्त युवा एकत्रित येऊन आपल्या संस्कृतीचे, धर्माचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने नववर्ष स्वागताचा सोहळा साजरा करीत आहेत. त्याचे विराट स्वरूप आज आपणा सर्वाना पाहावयास मिळत आहे. ही संस्कृती नित्यनूतन आहे. जे वाईट आहे त्याचा आपल्या संस्कृतीने त्याग केला असून, आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही जाती-धर्म आणि िलगाचा भेदभाव मान्य नाही. आनंद आहे की, आपण या वर्षी संकल्पना घेतली की, देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. महिलांच्या सहभागाशिवाय कोणताही विकास अपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.