कांदिवलीतील रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केल्याची  घटना  समोर आली आहे. बुधवारी रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या २४ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग केला. मात्र तिने प्रसंगावधान दाखवून आपली सुटका करवून घेतली.
ही तरुणी कांदिवली येथे राहत असून रात्री साडेदहाच्या सुमारास तिने मालाडच्या आपल्या कार्यालयाजवळून घरी जाण्यासाठी एक रिक्षा पकडली. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा तिच्या घराच्या दिशेने न नेता महावीरनगर येथील एका निर्जन स्थळावर नेली व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिने हातातील बॅगेने रिक्षाचालकाच्या डोक्यात प्रहार केला. त्याची पकड सैल होताच धावतच ती मुख्य रस्त्यावर आली आणि मदतीसाठी धावा केला. लोक तिच्या मदतीसाठी धावले, परंतु रिक्षाचालक तोपर्यंत घटनास्थळावरून पळून गेला होता. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.