प्रत्येक कला मृत्यूला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करते कारण त्याला मृत्यूवर आपली छाप सोडायची असते. तुम्हाला जिवंत राहायचे असते, पण मृत्यू हा अटळ आहे. अशावेळी ती कला तुम्हाला मृत्यूनंतरही जिवंत ठेवते. हे शब्द कुण्या तत्त्ववेत्याचे नाहीत तर आयआयटी झालेल्या तरुणाचे आहेत. तो आरामात लाखो रुपयांची नोकरी करू शकला असता, पण त्याने हातात लेखणी पकडली आणि तिने त्याला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत नेऊन पोहोचवले. लेखणीचा मोह न टाळू शकणाऱ्या या तरुणाने त्याच्या प्रत्येक शब्दातून रसिकश्रोत्यांना ‘मोह मोह के धागे..’ म्हणत कधी आपलेसे केले ते कळलेच नाही आणि मग रसिकश्रोत्यांनीही त्याला ‘मै तेरा हाय रे जबरा, हाय रे जबरा फॅन’ हो गया म्हणत दाद दिली. ‘मसान’चा लेखक आणि गीतकार वरुण ग्रोव्हरने शनिवारी पर्सिस्टंट सिस्टम लिमिटेडच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात रसिकश्रोत्यांशी संवाद साधला. अजय गंपावार यांनी हा दुवा साधला. या संवादादरम्यान मधूनमधून झालेली त्याच्या गीतांची पेरणी या तरुण लेखक-गीतकाराला आणखी खुलवत गेली. गायिका मंजिरी वैद्य हिने जेव्हा ‘मोह मोह के धागे..’ हे गाणे सादर केले, तेव्हा एका रसिकश्रोत्याच्या भूमिकेतून उभे राहून टाळया वाजवत वरुण ग्रोव्हरने तिला दाद दिली. त्याचवेळी एक आयआयटी तरुण लेखक इतका साधा असू शकतो, यावर शिक्कामोर्तब झाले. त्याचा आयआयटी ते लेखणी हा प्रवास उलगडतानाचा एक सुरुवातीचा किस्सा त्याने सांगितला. आई शिक्षिका आणि वडील सैन्यात अभियंता, त्यातच वडिलांना पुस्तकांचे प्रचंड वेड. या वेडाची लागण त्यालाही झाली आणि लेखक अतिशय शांत व संयमी असतो हे देखील कळले. म्हणूनच लेखणी हाती घ्यायचा पहिला विचार त्याच्या डोक्यात आला. लेखक जो लिहितो त्यात नवीन जग दिसते, हे देखील त्याला कळले, पण त्यावेळी आजूबाजूच्या वातावरणाने त्याला साथ दिली नाही. मात्र, आयआयटीत गेल्यानंतर हा किडा पुन्हा वळवळला आणि त्याने थेट त्याला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचवले. कलावंताला त्याच्या आतला आवाज शोधावा लागतो आणि ही प्रक्रिया म्हणजे अमर्याद बिंदूमधून आपला बिंदू शोधण्यासारखी आहे. कुणाच्याही मदतीशिवाय हा बिंदू शोधण्याचा प्रवास साध्य करणे कठीण आहे, पण ज्याला तो शोधता आला तो जिंकला. वरुण ग्रोव्हरने आज तरुणाईलाच नव्हे तर सभागृहात उपस्थित प्रत्येकच वयाच्या रसिकश्रोत्यांना जिंकले.