मानसशास्त्रीय कल चाचणीतील निष्कर्ष; ३०० पैकी निम्म्या विद्यार्थ्यांचा कल पालकांच्या दबावामुळे पाल्य नैराश्येत आणि तणावात वावरत असून ५० टक्के पाल्यांना घरातून पळून जावेसे वाटते, अशी गंभीर बाब मानसशास्त्रीय कल चाचण्यांतून पुढे आली आहे. प्रवेश परीक्षांच्या काळातही दहावी आणि बारावीचे महत्त्व कमी झालेले नाही. दहावी व बारावीत विद्यार्थ्यांला पडणाऱ्या गुणांवर त्याचे पुढील शिक्षण, त्याची बुद्धिमत्ता, सामाजिक स्तर आजही ठरतो! पालकांची दृष्टी अजूनही व्यापक झालेली नाही. विज्ञान, डॉक्टर आणि इंजिनिअरिंग याच्या पलीकडे उत्तुंग क्षेत्रे आहेत आणि त्यात पाल्याला रस असू शकतो, हे मानायला पालक तयार नाहीत. त्यामुळे दहावी व बारावीचे बरेच विद्यार्थी दबावात असतात. कारण अभ्यास, गुणांची तुतारी सतत त्याच्या मागे वाजवली जाते. त्यामुळे ५० टक्के मुलांना घरातून पळून जावेसे वाटते, असे तथ्य मानसशास्त्रीय कल चाचण्यांतून समोर आले आहे. काटोल मार्गावरील विभागीय व्यवसाय मार्गदर्शन निवड संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या समुपदेशन व मानसशास्त्रीय कल चाचण्यांच्या आधारे विद्यार्थ्यांची आवडनिवड, बुद्धय़ांक, भावनिक अंश, तसेच त्यांची तडजोड क्षमता अशा चार प्रकारांमध्ये चाचण्या घेतल्या जातात. या चाचण्या नऊ एप्रिलपासून सुरू झाल्या असून सुमारे ५०० मुलांची मानसशास्त्रीय कल चाचणी करण्याचे ठरवण्यात आले. त्यापैकी ३०० मुलांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांना घरातून पळून जावेसे वाटते का? असा प्रश्न विचारला असता त्यातील जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांनी होकार दर्शवल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. कल चाचणी करणाऱ्यांची संख्या कमी पाल्याची मानसशास्त्रीय कल चाचणी करणाऱ्या पालकांची संख्या आजही कमी आहे. अनेक पालकांना ते माहिती नाही. मात्र, भवन्स, सीबीएसईमधील पालक त्यांच्या पाल्यांचा मानसशास्त्रीय कल तपासायला येतात. त्यासाठी केवळ २०० रुपये शुल्क असून खाजगी ठिकाणी अडीच-तीन हजार रुपये देऊन पालक पाल्याची मानसशास्त्रीय कल चाचणी करून घेतात. त्यापेक्षा काटोल मार्गावरील तिडके कॉलेजच्या जवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळा परिसरात असलेल्या शासनाच्या विभागीय व्यवसाय मार्गदर्शन निवड संस्थेच्या केंद्रावर ही चाचणी पालकांना करता येईल. पाल्याला एमबीबीएस व्हायचे असेल तर त्याचा बुद्धय़ांक चांगला हवा किंवा पाल्य समाजात किंवा घरात वावरताना कोणत्या प्रकारची तडजोड करतो, हे विषय मानसशास्त्रीय कल चाचणीत येतात. चार प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. त्यातून बरीच विचित्र, अनपेक्षित माहितीही समोर येते. एखाद्या मुलाचा ‘आयक्यू चांगला असतो पण, त्याचा कल कला शाखेकडे असतो. पंधरा-सोळा वर्षांचे वय नाजूक असते. पालकांच्या दृष्टीने मुलांचे प्रश्न छोटे असतात. पण, पाल्याच्या दृष्टीने ते मोठे असतात. प्रतिष्ठेला शोभेल असे गुण घेण्याचा तगादा लावल्याने मुले दबावात असतात. आमच्याकडे जेव्हा त्यांना ‘घरातून पळून जावेसे वाटते का?’ असे प्रश्न विचारले गेले तेव्हा ५० टक्के पाल्यांची उत्तरे होकारार्थी आले. म्हणून पालकांचेही समूपदेशन करावे लागते. - स्नेहा गाडवे, समुपदेशक, विभागीय व्यावसाय मार्गदर्शन निवड संस्था, नागपूर