गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क सोय शिकण्याची जबर इच्छा मात्र, घरी अठरा विश्वे दारिद्रय़.. उच्च शिक्षणाची गावात सोय नाही.. आईवडील शिकवू शकत नाहीत.. शिक्षणासाठी शहरात गेले पाहिजे, पण रहायचे कुठे, खायचे काय.. शिक्षणासाठी मदत कोण करणार, याची भ्रांत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण मुलांचे नि:शुल्क वसतिगृह जगण्याबरोबरच शिक्षणासाठी हक्काचे घर ठरले आहे. विजय पाटील यांचे अथक प्रयत्न आणि आर्थिक मदतीतून अलीकडेच हे वसतिगृह नागपुरात सुरू झाले आहे. काटोलपासून ३० किलोमीटरवर बोरी झिला या गावी त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मनासारखे शिक्षण घेता न आल्याची खंत त्यांच्या मनात कायम राहिली. केवळ पैशाअभावी कुणाचे शिक्षण राहू नये, असा निश्चय करून विजय पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी रेवतीनगरातील स्वमालकीच्या भूखंडावर वसतिगृह सुरू केले. सुरुवातीला चार भिंती आणि त्यावर छत स्वखर्चातून उभारले. त्यांचे काम पाहून लोकांनी बांधकाम साहित्याची मदत केली. असेच एक त्यांनी काटोलला उभारायचे ठरवले आहे. सध्या त्याचे बांधकाम सुरू आहे. रेवतीनगरातील वसतिगृहात २०११मध्ये एक मुलगा शिक्षण घेत होता. २०१२मध्ये दोन मुले शिक्षण घेऊ लागली. सध्या त्यांच्याकडे ३५ मुले वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण घेत असून त्यात ओबीसी, एससी, मारवाडी, एसटी अशा सर्वच प्रवर्गातील यवतमाळ, गोंदिया, भंडारा, जालना, वाशीम, अकोला आदी ठिकाणच्या मुलांचा समावेश आहे. सर्व काही मुलेच वसतिगृहासाठी मदतनीस, वॉर्डन, स्वयंपाकी किंवा कर्मचारी नाहीत. ही सर्व जबाबदारी मुलेच सांभाळतात. ३५ मुलांपैकी अर्धे सकाळी, तर अर्धे सायंकाळी स्वयंपाक करतात. व्यक्तिगत आणि वसतिगृहात वाटून दिलेली कामेही तेच करतात. कधीकधी भाजीला नसते. आता लोक बऱ्यापैकी धान्य देतात किंवा मुले घरून काही घेऊनही येतात. पण एकाही मुलाकडून वसतिगृहाचे किंवा इतर शुल्क घेतले जात नाही. सुट्टीच्या दिवशी मुले कॅटरिंगच्या कामासाठी किंवा इतर कामांसाठी जातात. आम्ही घडलो तुम्हीही घडा तीन विद्यार्थ्यांनी वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले आणि आता चांगल्या नोकऱ्यांमध्ये ते लागले आहेत. त्यापैकी मोहाडचे पवन अलोने गुजरातमध्ये सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) काम करतात. राहुल सोमकुंवर रेल्वेत तर खुशाल राऊत समाजकल्याणमध्ये नोकरी करीत आहेत. अलोणे यांनी अगदी अलीकडे केलेल्या ११ हजार रुपयांच्या मदतीतून वसतिगृहाला रंगरंगोटी करण्यात आली. तशीच मदत राहुल आणि खुशालही करीत आहेत.