उच्च न्यायालयाचे निरीक्षण, पतीला घटस्फोट मंजूर पती किंवा कुणालाही न सांगता वारंवार घर सोडून जाणे आणि बाहेर राहणे ही एकप्रकारची क्रूरताच आहे. पत्नीच्या अशा वागण्यामुळे पतीच्या मानसिकतेचा विचार करता तो घटस्फोटासाठी पात्र आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदविले. उकेश (५१) हे नागपुरात राहतात. ७ मार्च १९९४ ला त्यांचा भोपाळ येथील रसिका (दोघांचेही नाव बदललेले) हिच्याशी विवाह झाला. लग्नानंतरचे अनेक वर्षे आनंदात निघाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. काही वर्षांनी पत्नीच्या वागण्यात अचानक बदल झाला. ती शीघ्रकोपी झाली. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून ती पती आणि सासूशी वाद घालायची. सासूला वाईट वागणूक द्यायची. २००५ मध्ये ती एका व्यक्तीच्या संपर्कात आली आणि तिने ब्युटी व मसाज पार्लर उघडण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात माहिती मिळताच उकेशने तिच्या संपर्कातील व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे चारित्र्य योग्य नव्हते. त्यामुळे पतीने पत्नीला ब्युटी व मसाज पार्लर न उघडण्यास सांगितले. मात्र, पत्नीने परस्पर घरातील दागिने विकले, सासूच्या आलमारीतून पैसे चोरले व बँकेचे कर्ज घेऊन ब्युटी व मसाज पार्लर टाकले. त्यानंतर ती वारंवार पती व सासूला न सांगता घराबाहेर निघून जायची. अनेक दिवस ती परत येत नव्हती. त्यानंतर अनेकदा उकेशने पत्नी हरविल्याची तक्रार पोलिसात दिली. मात्र, तिच्या स्वभावात बदल होत नव्हता. याचा दुष्परिणाम मुलांच्या संगोपनावर होत होता. २००५ मध्ये तिने घर सोडले आणि धरमपेठ परिसरातील एका होस्टेलमध्ये वेगळी राहू लागली. त्यानंतर पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाकरिता अर्ज केला. त्या अर्जावर सुनावणी झाली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०१० ला पतीला घटस्फोट नाकारला. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलावर न्या. वासंती नाईक आणि न्या. विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून घटस्फोट मंजूर केला. पतीला मन:स्ताप पतीने पत्नी हरविल्याची अनेकदा पोलिसात तक्रार केली, परंतु पत्नीने परतल्यानंतर एकदाही पोलीस ठाण्यात तक्रार खोटी असल्याचे पुरावे सादर केले नाही. यावरून पत्नी ही घर सोडण्याच्या सवयीची असल्याचे सिद्ध होते. कुणालाही न सांगता वारंवार घराबाहेर जाणे, पतीला तिच्या सहवासातील लोक न आवडणे आदी बाबींमुळे पतीला प्रचंड मन:स्तान सहन करावा लागल्याचे दिसते. तसेच दोन्ही मुले हे वडिलांकडे आहेत. आईने मुलांना मिळविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही. यावरून पत्नीकडून पतीवर क्रूरता होत असल्याचे स्पष्ट होत असून कौटुंबिक न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर करणे आवश्यक होते. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द ठरवित न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला.