भारताच्या इतर भागाच्या तुलनेत मुखाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण नागपुरात आहेत. या रुग्णांवर उपचार करताना ‘लाईट’ (रेडिएशन) देण्याकरिता बोटावर मोजण्याइतकेच विकिरणोपचार तज्ज्ञ शहरात आहे. यामुळेच लाईटकरिता रुग्णांना मोठी प्रतीक्षा करावी लागते. पैकी काही रुग्णांचा उपचारापूर्वीच मृत्यू होतो. कर्करुग्णांचे हाल थांबवण्यासाठी शासनाकडून काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

भारताच्या विविध भागाच्या तुलनेत नागपूरला दरवर्षीच सर्वाधिक मुखाच्या कर्करुग्णांची नोंद होते. रुग्ण वाढण्याला शहरात सर्रास प्रतिबंधात्मक गुटखा, पानमसाला, विविध तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधीत सुपारीची विक्री व त्याच्या सेवनासह वाढते धुम्रपान कारणीभूत आहे. हे पदार्थ नागरिकांना सहज शहराच्या कोणत्याही भागात उपलब्ध होत असल्याने त्याचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे बऱ्याच सामाजिक संस्थांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. सोबत इतरही कारणाने शहरात वेगवेगळ्या प्रकारचे कर्करुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढत असतानाच शहरात त्यांच्यावर उपचाराच्या सोयी सुविधा मात्र फार तोकडय़ा आहे.

नागपूर शहरात प्रत्येक वर्षी ७ हजारांहून जास्त नवीन कर्करुग्णांची नोंद केली जाते. पैकी अनेक रुग्णांना उपचाराचा एक भाग म्हणून ‘लाईट’ देण्याची गरज असते. यासाठी विकिरणोपचार तज्ज्ञांची गरज आहे, परंतु शहरात सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय व संशोधन संस्थेत २ विकिरणोपचार तज्ज्ञ उपलब्ध असल्याची माहिती आहे. खासगी रुग्णालयात काही तज्ज्ञ असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची नोंद मात्र सरकारी दफ्तरी नाही.

विकिरणोपचार तज्ज्ञ कमी असल्याने निश्चितच प्रत्येक केंद्रात फार कमी रुग्णांना नित्याने ‘रेडिएशन’ दिले जाते. तेव्हा अनेक रुग्णांना ‘रेडिएशन’करिता प्रतीक्षा यादीत ठेवावे लागते. शेवटच्या टप्प्यात कर्करोग आढळलेल्या रुग्णांना बरेचदा ‘रेडिएशन’ मिळण्यात अडचण येत असल्याने प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. काही रुग्णांचा ‘रेडिएशन’ मिळण्यापूर्वीच मृत्यूही होत असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात.

तेव्हा विकिरणोपचार तज्ज्ञांची संख्या वाढवण्याकरिता शहरासह राज्यात या विषयाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम वाढवण्याची गरज पुढे येत आहे.प्रादेशिक कर्करोग रुग्णालयात ३,३०० रुग्णांची नोंद

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालय व संशोधन संस्थेत २०१४ मध्ये एकूण ४ हजार ७०९ रुग्ण उपचाराकरिता आले. त्यातील ३,३०० रुग्ण धोकादायक तर १४०९ रुग्ण धोक्याबाहेरील अवस्थेतील होते. त्यामध्ये सर्वाधिक ८४८ (२५.७० टक्के) रुग्ण मुखाच्या कर्करोगाचे, ४८७ (१४.७६ टक्के) महिला रुग्ण गर्भाशयाच्या कर्करोगाचे, ४३० महिला (१३.०३ टक्के) स्तनाच्या कर्करोगाचे, १०८ (३.२७ टक्के) फुफ्फुसाच्या कर्करोगाचे, १४२७ (४३.२४ टक्के) इतर वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण आढळले.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवा -डॉ. कांबळे

महाराष्ट्रात केवळ नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे विकिरणोपचार विषयाच्या दोन पदव्युत्तर जागा उपलब्ध आहेत, परंतु भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय)च्या त्रुटी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून दूर न झाल्याने या जागांची मान्यता रद्द झाली आहे. कर्करुग्णांना जास्त विकिरणोपचार तज्ज्ञ उपलब्ध करून देण्याकरिता मेडिकलसह मेयो व इतरही सगळ्याच शासकीय संस्थांत पदव्युत्तरचे अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे, असे मत शहरातील ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. क्रिष्णा कांबळे यांनी व्यक्त केले.