अचानक संपामुळे प्रवाशांना त्रास; प्रशासन हतबल महापालिकेच्या शहर बस कर्मचाऱ्यांनी अचानक संप करून आज पुन्हा एकदा प्रवाशांना वेठीस धरले. महापालिकेची ‘आपली बस’ सेवा पुन्हा एकदा ‘परकी’ ठरली. बस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश आल्याने हा प्रसंग ओढावला. हतबल प्रशासन, बेपर्वा पदाधिकारी आणि वेढीस धरणारे कर्मचारी यांच्यात शहर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वारंवार कोंडी होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. शहर बस सेवेतील तीन ऑपरेटरकडील कर्मचाऱ्यांनी वाढीव वेतनासह इतरही मागण्यांसाठी बुधवारी कुठलीही पूर्वसूचना न देता संप केला. विशेष म्हणजे सकाळी बसेस सुरू होत्या. मात्र मध्येच थांबवून संप असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे बसमधील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. संपामुळे ऑटोचालकांची चांदी झाली. त्यांनी दर वाढविल्याने प्रवाशांच्या खिशावर भार वाढला. संपाचा फटका विद्यार्थी, चाकरमानी आणि सामान्य नागरिकांना बसला. २१० बसेसपैकी आज एकही बस धावली नाही. महापालिकेने कंत्राटदार बदलविल्यांतर एका महिन्यातील हा दुसरा संप आहे. राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. केंद्रातील भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरी नागपूरचे आहेत. महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. मात्र शहरातील बससेवेचा मात्र पुरता बोजवारा उडाला आहे. शहरात दररोज २१० बसेस धावतात. बुधवारी प्रारंभी हिंगणा डेपोमधील चालक आणि वाहक कामावर आले नाही. त्यामुळे जवळपास ५० बसेस उभ्याच होत्या. खापरी डेपोमधून १८ आणि पटवर्धन डेपोमधील ५२ बसेस शहरात सुरू होत्या. हिंगणा डेपोमधील चालक वाहक संपावर गेल्याची माहिती इतर डेपोतील कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी मध्येच बसेस थांबवून प्रवाशांना खाली उतरवून दिले व संपात सहभागी झाले. त्यामुळे संपूर्ण बससेवा ठप्प झाली. रस्त्यात उभ्या केलेल्या बसेसमध्ये सरकारी कर्मचारी, शाळेत जाणारे विद्यार्थी आणि इतरही नागरिक होते. विशेषत: हिंगणा, कोराडी, कामठी, हुडकेश्वर या भागासह अन्य भागातून मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी आणि चाकरमानी बसने प्रवास करतात. मात्र कुठलीही सूचना न देता कर्मचाऱ्यांनी बस सेवा बंद केल्यामुळे नागरिकांचे कमालीचे हाल झाले. अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेवर पोहचता आले नाही. अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. सकाळी कार्यालयात जाताना आणि सायंकाळी कार्यालयातून घरी परत जाणारे कर्मचाऱ्यांची आज चांगलीच फजिती झाली. सकाळी बसेस बंद होत्या तर सायंकाळी तरी सुरू होतील या आशेने अनेक कर्मचारी खासगी वाहनांनी कार्यालयात गेले, मात्र सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांच्यासोबत महापालिकेने कुठलीही चर्चा केली नाही आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला आणि जनतेला वेठीस धरल्यामुळे यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. खासगी वाहनांनी भाडे वाढविल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला. अनेक विद्यार्थ्यांजवळ पैसे नसल्याने त्यांची गैरसोय झाली आणि त्यांना शाळेत जाता आले नाही. दरम्यान, महापालिका प्रशासनाने चालक- वाहक कर्मचारी संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलविले. मात्र, वाढीव वेतनासह इतर मागण्यांवर ते ठाम असल्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही आणि ऑपरेटर कंपनीकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कामावर येणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या विरोघात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संपावर गेलेले चालक- वाहक रात्री उशिरापर्यंत कामावर आले नाही तर त्यांच्या विरोधात कडक पावले उचलावी लागणार आहे. ज्यांच्याकडे परवाना आणि कंपनीचे ओळखपत्र आहे त्यांना कामावर घेण्यात येईल, मात्र अन्य चालक- वाहकांच्या विरोधात कडक पावले उचलण्यात येणार आहे. सर्व चालक- वाहकांना कामावर सामावून घ्या, अशी त्यांची मागणी होती. त्याप्रमाणे ११२८ पैकी ८०० चालक- वाहक आणि कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले आहे आणि उर्वरित चालक, वाहकांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. वेतन वाढीसंदर्भात त्यांनी मागणी रेटून धरली आहे. मात्र, करारानुसार जे वेतन ठरले आहे ते त्यांना देण्यात येत आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त वेतन देता येत नाही. आठ तासापेक्षा जास्त काम त्यांना देण्यात येणार नाही आणि दिले तर त्याचा ‘ओव्हर टाईम’ त्यांना देण्यात येणार आहे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या असताना कामावर येत नसतील तर त्यांच्या विरोधात कारवाई करावी लागेल आणि नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. - श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त