नव्या पालीचा भारतात १३० वर्षांनी शोध भारतात १३० वर्षांनंतर नव्या पालीच्या शोध लावण्यात युवा संशोधकांना यश आले आहे. मध्य व पश्चिम भारतात गेकोइला कोलेगलन्सी या नावाने परिचित असलेल्या पालीचे जिन्स या नव्या पालीत आढळले आहेत. पालींच्या संशोधनासंदर्भात आतापर्यंतची ही सर्वात मोठी उपलब्धी समजली जाते. या पालीला ‘चिरोटोडॅक्टिस वरद गिरी’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या विल्लानोवा विद्यापीठाचे डॉ. ईशान अग्रवाल, डॉ. अॅरोन बॉर, तसेच बंगळुरूच्या नॅशनल सेंटर फॉर बॉयोलॉजिकल सायन्सचे झिशान मिश्रा, मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटाचे शौनक पाल या युवा संशोधकांना ही पाल शोधून काढण्यात यश मिळाले आहे. या पालीसंदर्भात त्यांनी भारतभ्रमंती केली. त्यानंतर ही पाल वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भारतात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वावर असला तरीही ती दुर्मीळ आहे. ..अन्यथा पाल नामशेष मनुष्यवस्ती आणि जंगलांमधील खडकाळ गवती कुरणाचा पट्टा म्हणजे, या पालीचा अधिवास आहे. मात्र, अलीकडील शहरीकरण, विकास प्रकल्प आणि इतर कारणांमुळे खडकाळ गवती कुरणांचा परिसर कमीकमी होत आहे. पुढील १५० वर्षांपर्यंत शहरीकरण अणि विकासाच्या गर्तेत पालींचा हा अधिवासही नष्ट होईल आणि त्यामुळे या पालीच्या अस्तित्वावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. तिचा हा अधिवास सुरक्षित राखला नाही, तर पुढील १५० वर्षांत ती नामशेष होऊ शकते, अशी भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. दुर्मीळ आणि निशाचर असलेल्या या पालीचा अधिवास इतर पालींपेक्षा वेगळा आहे. सहा सेंटीमीटपर्यंत तिची लांबी असते आणि महाराष्ट्र, गुजरातसह व मध्य प्रदेशात ती आढळते. संशोधकांच्या चमुने सरिसृप क्षेत्रातील संशोधनातील सर्वात मोठे व्यक्तिमत्त्व डॉ. वरद गिरी यांचे नाव या पालीला दिले. ही नवी प्रजाती ‘झुटाक्सा’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. संपूर्ण सरिसृप संशोधनात ही मोठी उपलब्धी आहे. त्यातही युवा संशोधकांनी अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर ती शोधली. - डॉ. वरद गिरी