जोशी, देशपांडे, कुलकर्णी यांची महाराष्ट्रात अवस्था चांगली नाही, पण श्रीपाद जोशींचे कौतुक बहुजन समाजातील सानप करतात, याविषयी आश्चर्य व्यक्त करीत ब्राह्मण्य फक्त ब्राह्मणात नाही तर ते बहुजनांतही असल्याची खरमरीत टीका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले. ग्रंथालीने आयोजित केलेल्या डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या ‘मथितार्थ’ आणि ‘इत्यादी’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन कार्यक्रम विनोबा विचार केंद्रात पार पडला. अध्यक्षस्थानी सबनीस तर कवितासंग्रहावर भाष्य करण्यासाठी डॉ. अजय देशपांडे आणि डॉ. किशोर सानप व्यासपीठावर होते. डॉ. सबनीस म्हणाले, साम्राज्यशाहीचा विरोध डॉ. श्रीपाद जोशी यांच्या कवितेचे वैशिष्टय़ आहे. अर्थमूल्य, विश्वात्मक समाजकारण, राजकारण असा जोशींचा प्रयत्न असून माणूसपण शोधणे, समजून घेणे आणि माणसाचे चांगुलपण त्यांनी पचवले आहे. कवितेत कुठलेही संत, महात्मे, महंत, महापुरुष फुले, आंबेडकर नाहीत, तरीही त्यांची कविता ही समतावादी, परिवर्तनवादी आहे. मानवतावादाशी त्यांच्या कवितेचा संबंध आहे. अभिजात साहित्यातील महत्त्वपूर्ण अशी त्यांची परिवर्तनवादी कविता असून जोशी नावाने ते लिहित आहे. आजच्या परिस्थितीत जोशी, देशपांडे, कुलकर्णी यांची महाराष्ट्रात अवस्था चांगली नाही. जोशींचे कौतुक बहुजन समाजाताली सानप करतात याचे आश्चर्य वाटते असे सांगतानाच ब्राह्मण्य फक्त ब्राह्मणात नाही तर ते बहुजनांमध्येही आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही त्यांनी याप्रसंगी नोंदवले. अजय देशपांडे म्हणाले, दोन्ही कवितासंग्रहांचा लिहिणे आणि लढणे याच्याशी घनिष्ठ संबंध आहे. मुस्कटदाबीच्या विरोधात लिहिणे ही डॉ. जोशी यांची खासीयत आहे. डॉ. किशोर सानप यांचेही यावेळी भाषण झाले. संचालन अजेय गंपावार यांनी केले.