लढण्यासाठी कुठलीही परकीय सत्ता नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शस्त्रास्त्रांची मोठय़ा संख्येने पूजा करून हिंसक वृत्तीच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण करीत आहे. शस्त्रपूजन करणे गरजेचे असेल तर देशाच्या सीमांवर लष्कराची आणि देशांतर्गत संरक्षणाची गरज काय, असा प्रश्न भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांमध्ये हिंसेच्या रूपाने प्रतिक्रिया दिली जात असून त्याबरोबर क्रूरताही वाढली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींच्या संदर्भात म्हणाले होते की, त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात जनआंदोलन करून एक मानसिकता उभी केली. आता परकीयांची सत्ता नाही, तर आपणच आपल्यावर राज्य करू. तर नेमके शस्त्रपूजन करून आपणच आपल्या विरोधात कसे? याचे उत्तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी द्यावे.

अशा परिस्थितीत शस्त्रपूजन म्हणजे लोकांनी शस्त्रे बाळगावीत, असा संदेश पसरवणे झाले. त्यातून हिंसा आणि क्रूरता वाढते. वादाचे काहीही कारण असो, हरयाणातील घराला आग लावून दोन निष्पाप जीवांचा बळी घेणे, हे शस्त्रपूजेचेच प्रतीक आहे.
शस्त्रपूजन नैमित्तिक म्हटले तर सामाजिक मानसिकतेचा संघ काही विचार करणार की नाही? त्यामुळे प्रत्येक जण शस्त्र बाळगायला लागेल. यापूर्वीही दसऱ्याला आरएसएस शस्त्रपूजन करीत होते. मात्र, सत्तेत असूनही त्यांची प्रतिमा शांततामय नसल्याची टीका त्यांनी केली. नक्षलवादी करतात तीही हिंसाच. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. शहरात सापडलेल्या संशयित नक्षलवाद्यांबद्दल लोकांना सहानुभूती असली तरी त्यांच्या हिंसेचे ते समर्थन करीत नाहीत, असे ते म्हणाले.

‘बुजगावण्यांनी सत्तेत राहू नये’
दलितांना शस्त्रास्त्रे द्यावीत, या खासदार रामदास आठवलेंच्या नागपुरातील वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘बुजगावण्यांनी सत्तेत राहू नये. सत्तेत असताना धोरणे पटत नसतील तर बाहेर पडावे. बुजगावणे म्हणून राहू नये’, असे म्हणताना त्यांनी यात खासदार उदित राज, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचाही समावेश केला.