दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानविषयी नेहमी कठोर व टोकाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेची भाषा आता भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सुद्धा बोलू लागले आहे. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पठाणकोट अतिरेकी हल्ल्याच्या मुद्यावर बोलताना भारताने पाकिस्तामध्ये शिरून तेथील अतिरेक्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आपणच ही मागणी करीत असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.
केंद्र सरकारचे अंतर्गत सुरक्षेकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे, असे सांगून मंदिरातील पुजारी देशाची सुरक्षा करू शकणार नाही, अशी टीका त्यांनी भाजपचे नाव न घेता केली. त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदीं व भाजपच्या नेत्यांकडे होता. दरम्यान रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी मंत्री स्मृती इराणी यांच्यावर पंतप्रधानांनी कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.