दीक्षाभूमी-रेशीमबागेत कडेकोट बंदोबस्त; हवाई दौऱ्यावर पावसामुळे प्रश्नचिन्ह राष्ट्रपतीपदीची सूत्रे स्वीकारल्यानंतर रामनाथ कोविंद प्रथमच शुक्रवारी, २२ सप्टेंबरला नागपुरात येत आहेत. त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ते हेलिकॉप्टरचा वापर करणार आहेत. या दौऱ्यानिमित्त शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यादृष्टीने गुरुवारी सकाळी १० वाजता राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांनी विमानतळापासून राजभवन आणि विविध मार्गाने सराव केला. सध्या ढगाळ वातावरण असल्याने वेळेवर हेलिकॉप्टर प्रवास रद्द करून रस्ते मार्गानेही राष्ट्रपतींच्या दौऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ग्रामीण पोलिसांनी कन्हान ते रामटेक या दरम्यान वाहनांची रंगीत तालीम घेतली. सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन होईल. तेथून ते रस्ते मार्गाने दीक्षाभूमीवर पोहोचतील आणि तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करून डॉ. आंबेडकरांच्या अस्थींचे दर्शन घेतील. त्यानंतर रामटेकला जातील. तेथून कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरातील नवीन विपश्यना केंद्राचे उद्घाटन करतील व बुद्ध वंदना करून ते राजभवनात पोहोचतील. त्यानंतर तयारी करून पुन्हा कारने राजभवनातून जपानी गार्डन चौकाच्या मार्गाने लेडिज क्लब चौक व तेथून रिझव्र्ह बँक चौक, काँग्रेसनगर, मेडिकल चौक मार्गाने रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते कारने थेट विमानतळावर जातील. सायंकाळी ५.३० वाजता दिल्लीला रवाना होतील. यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील इतरही सदस्य उपस्थित राहणार आहेत. रामटेक येथे जैन मंदिरात जैन धर्मगुरुची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती जाणार आहेत. त्यामुळे तेथील बंदोबस्त ग्रामीण पोलिसांकडे असून त्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वात ३ अतिरिक्त अधीक्षक, ७ उपअधीक्षक, २१ पोलीस निरीक्षक ५२ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि ७६० पोलीस कर्मचारी ५० वाहतूक पोलीस कर्मचारी, ३ बॉम्ब शोधक व नाशक पथके आणि १ राज्य राखिव पोलीस बलाची तुकडी बंदोबस्तात तैनात करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त कन्हानपासून ते रामटेकपर्यंत राहील. या दौऱ्यादरम्यान शहरातील चार रुग्णालयात विशेष कक्ष आरक्षित करण्यात आल्या आहेत. ग्रामीणमध्ये हजारांवर पोलीस तैनात रामटेक येथे जैन मंदिरात जैन धर्मगुरुची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती जाणार आहेत. त्यामुळे तेथील बंदोबस्त ग्रामीण पोलिसांकडे असून त्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वात ३ अतिरिक्त अधीक्षक, ७ उपअधीक्षक, २१ पोलीस निरीक्षक ५२ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि ७६० पोलीस कर्मचारी ५० वाहतूक पोलीस कर्मचारी, ३ बॉम्ब शोधक व नाशक पथके आणि १ राज्य राखिव पोलीस बलाची तुकडी बंदोबस्तात तैनात करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त कन्हानपासून ते रामटेकपर्यंत राहील. या दौऱ्यादरम्यान शहरातील चार रुग्णालयात विशेष कक्ष आरक्षित करण्यात आल्या आहेत. हेलिपॅड तयारच होऊ शकले नाही? राष्ट्रपती दीक्षाभूमीवरून हेलिकॉप्टरने रामटेक व तेथून कामठीला जाणार होते. त्यानंतर हेलिकॉप्टरने नागपुरात परत येणार होते. परंतु दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने रामटेक व कामठी येथे हेलिपॅड तयार होऊ न शकल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचा हेलिकॉप्टर प्रवास जवळपास रद्द करण्यात आला असून ते कारनेच संपूर्ण दौरा करणार असल्याची माहिती आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही. १० उपायुक्त, दोन हजारांवर कर्मचारी राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपती दौऱ्याच्या प्रत्येक ठिकाणी एक पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात बंदोबस्त आहे. त्यामुळे संपूर्ण दौऱ्याकरिता १० पोलीस उपायुक्त, १३ सहाय्यक पोलीस आयुक्त, ५६ पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, १६५ उपनिरीक्षक, १ हजार ४२९ पुरुष कर्मचारी आणि २२६ महिला कर्मचारी रस्त्यांवर तैनात असतील. त्याशिवाय १८ बॉम्ब शोधक व नाशक पथके तैनात राहणार असून त्यापैकी १५ पथके बाहेर जिल्ह्य़ातून बोलवण्यात आली आहेत. राष्ट्रपतींच्या पहिल्या फेरीतील सुरक्षा व्यवस्था ही विशेष सुरक्षा पथकाच्या (एसपीयू) अखत्यारित असेल. याशिवाय बाहेर जिल्हाधिकारी कार्यालये व अधीक्षकांकडून जामर व आदी वाहने पाचारण करण्यात आली आहेत. रामटेक येथील कार्यक्रमाची सुरक्षा व्यवस्था ग्रामीण पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वात सांभाळण्यात येणार आहे. एकंदर राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त शहराला छावणीचे स्वरूप येणार आहे.