शहरात एकमेव अधिकृत वाहनतळ
स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी निवड झालेल्या नागपूर शहरातील धक्कादायक वास्तव म्हणजे, साडेतेरा लाख दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या या शहरात केवळ एकमेव अधिकृत वाहनतळ आहे. त्यामुळे पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी होणाऱ्या ठिकाणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
महापालिकेने एल.अँड टी. रामबॉल इंजिनिअरिंग लिमिटेडकडून शहरातील वाहतुकीची पाहणी केली. शहरात वाहनतळ नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्ता रहदारीला अडथळा निर्माण होतो. त्याचा परिणाम वाहतूक कोंडी होणे, वाहने संथगतीने चालवावी लागणे आदी प्रकार घडत आहेत. तेव्हा नवीन इमारतींमध्ये वाहनतळ विकसित करून वाहनतळांचे निकष कठोरपणे लागू करण्याची आवश्यकता आहे, तसेच सार्वजनिक ठिकाणी सुयोग्य वाहनतळ व्यवस्था करण्याची गरज आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
नागपूर सुधार प्रन्यासने सीताबर्डीवर एक वाहनतळ बांधलेला आहे. सेन्ट्रल अ‍ॅव्हेन्यूवर दोन वाहनतळ प्रस्तावित आहेत. त्यासाठी निविदा काढण्यात आली, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार म्हणाले. महापालिकेने जनता चौक ते व्हरायटी चौकादरम्यान उड्डाण पुलाच्या खाली ‘पे अँन्ड पार्क’ वाहनतळ आखून दिले आहेत. शहरात वाहनतळांचे अद्याप धोरण नसल्यामुळे खासगी वाहनतळांचा धंदा जोमात आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा सत्र न्यायालय, रुग्णालये, बाजारपेठा, मॉल परिसरातील वाहनतळ कंत्राटदारांच्या हवाली करण्यात आले आहेत. त्यामुळे कुठेही खासगी वाहनाने जाण्याचा बेत आखण्यापूर्वी वाहनतळाची व्यवस्था आहे काय, असा प्रश्न पडतो.
शहरात गणेशपेठ बसस्थानक परिसरात तीन, छत्रपती चौक, सोमलवाडा, भंडारा मार्ग आदी भागात खासगी वाहनतळे आहेत. वाहनतळ नसल्याने रेसिडन्सी रोड मार्गावर दोन्ही बाजूला चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे लिबर्टी चित्रपटगृहापासून राजभवनपर्यंत वाहतुकीची खोळंबा होत असतो.

पाहणीतील निरीक्षणे
दररोज सुमारे ८० हजार वाहने १६ तासांच्या कालावधीत वेगवेगळ्या रस्त्यांवर असतात. घाट रोडजवळील नाला क्रॉसिंगवर सर्वाधिक सुमारे ७९ वाहने आढळून आली. त्यापाठोपाठ एक दिवसाला सर्वाधिक वाहने सेन्ट्रल अ‍ॅव्हेन्यूवर आढळून आली. त्यांची संख्या ५० हजार वाहने एवढी आहे.

’ वाहतूक कोंडी होणारी महत्वाची ठिकाणे
’ अजनी चौक
’ मानेवाडा चौक
’ एलआयसी चौक-राणा प्रतापनगर चौक
’ चौक-जनता चौक-छिंदवाडा काटोल चौक-वैष्णोदेवी चौक-आरबीआय चौक
’ गड्डीगोदाम चौक-कडबी चौक-गोळीबार चौक
’ इंदोरा चौक-मेंटल हॉस्पिटल चौक
’ लोखंडी पूल
’ रेसिडेन्सी रोड
’ झांशी राणी चौक
’ किंग्ज वे रोड

पार्किंग सव्र्हे
’ रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली वाहने साधारणत दोन तास उभीच असतात.
’ अभ्यंकरनगर रस्त्याच्या कडेला रात्री ७ ते रात्री ८ च्या दरम्यान ४७ कार उभ्या असतात.
’ सेन्ट्रल अॅव्हेन्यूवर सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान
१३० कार उभी असल्याचे आढळून आले.
’ चिटणीस पार्क (मंगळवारी) रस्त्याच्या कडेला रात्री ७ ते रात्री ८ वाजता ५८ कार उभ्या असतात. गोळीबार चौक परिसरात रात्री ७ ते रात्री ८ वाजता ५८ कार उभ्या असल्याचे आढळून आले.
’ कामठी रोडवर याच काळात ६१, महाल परिसरात
७०, जुना भंडारा रोडवर ५६, रेसिडेन्सी रोडवर सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत ४३, वर्धा रोडवर ६३, वेस्ट हायकोर्ट रोडवर सकाळी १० ते ११ कालाधीत १२१ कार उभ्या असल्याचे पाहणीत दिसून आले.

मी नागसेन विद्यालयात शिक्षक आहे. माझे राहणे मिरे लेआऊटमध्ये आहे. शाळेत येण्यासाठी शहर बसव्यवस्था नाही. त्यामुळे दुचाकीने मी शाळेत येतो. भांडे प्लॉट ते सक्करदरा, महाल, पाचापावली, कमाल चौक मार्गे शाळेत ये-जा करतो. या मार्गावर चिटणीस पार्क, डागा रुग्णालय आणि गोळीबार चौकात कायम वाहतूक कोंडी होते.
– महेश गिनगुले.