आ. भाई जगताप नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसह आरपीआय (कवाडे गट), कम्युनिस्ट पक्ष अशा समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याची माहिती पक्ष निरीक्षक आ. भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन बघता पक्षाच्यावतीने गुरूवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक तसेच विविध सेलचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. निवडणूक स्व बळावर लढावी की आघाडी करून याबाबत चाचपणी करण्यात आली. २६ पैकी चार कार्यकर्त्यांनी स्व बळाचा नारा दिला तर उर्वरीत कार्यकर्त्यांनी आघाडीचा आग्रह धरला. तसेच जातीयवादी पक्षांशी कोणतीही चर्चा न करता समविचारी पक्षासोबत पुढे जावे असा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने पुढील आठवडय़ात एक समिती गठीत करण्यात येणार असून त्यामध्ये कम्युनिष्ट, आरपीआय (कवाडे गट), राष्ट्रवादी यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल. ही समिती चर्चेसोबत विद्यमान नगरसेवकांच्या जागेवर आरक्षण आल्यास संबंधितांना अन्य ठिकाणी कशी निवडणूक लढविता येईल याचा विचार करेल. गेल्या पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता मनसेने शहर विकासाचा बट्टय़ाबोळ केला असल्याचा आरोप करत काँग्रेस आघाडी सत्तेत येईल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. निवडणुकीसाठी आघाडी सन्मानपूर्वक व्हावी. या प्रक्रियेत कोणतीही फरफट मान्य नाही. समविचारी पक्षासोबत आघाडी म्हणजे प्रासंगिक करार असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण वेगळे आहे. त्या त्या ठिकाणी विशिष्ठ पक्षाचा असणारा प्रभाव दुर्लक्षित करून चालणार नाही अशी पुष्टी त्यांनी जोडली.