चंदू चव्हाण…भारतीय लष्करातील जवान. मूळचा धुळ्याचा…चार महिन्यांपूर्वी नजरचुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेला. त्याला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. याबाबत त्याच्या कुटुंबीयांना समजले. आपला नातू पाकिस्तानच्या कैदेत असल्याचे समजताच त्याच्या आजीला हा धक्का सहन झाला नाही. तिने प्राण सोडले. पण आपला भाऊ, नातू परत येईल, अशी आशा त्याच्या कुटुंबीयांनी सोडली नाही. अखेर पाकिस्तानने चार महिन्यांनी चंदू चव्हाणची सुटका केली. आपला मुलगा मायदेशी परतला आहे, हे कळताच चंदू चव्हाणच्या आजोबांनी इतके दिवस डोळ्यांत साठवून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूंचा पूर आला होता. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या, त्याच्या नातेवाईकांच्या, शेजाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले होते. आपला चंदू परत आला आहे, असे म्हणून आज आख्ख्या गावात जल्लोष करण्यात आला.

ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो, तो दिवस आज अखेर उजाडला. आजचा दिवस अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात राहील, अशा शब्दांत चंदू चव्हाण याचे आजोबा चिंधा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याची आज पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली. तब्बल चार महिन्यांनंतर तो मायदेशी परतला. चंदू चव्हाण हा नजरचुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. २९ सप्टेंबरपासून तो पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात होता. त्याच्या सुटकेची बातमी समजताच कुटुंबासह संपूर्ण गावाने आनंदोत्सवच साजरा केला. देशाभिमान जागृत करणारी गाणी आणि नृत्य तसेच मिठाई वाटप करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

चंदू चव्हाण याच्या बालपणातच त्यांच्या आई – वडिलांचा मृत्यू झाला होता. भूषण, चंदू आणि त्याची बहीण रुपाली यांना मामाच्या गावी म्हणजे बोरविहिर येथे आणण्यात आले. मामाकडे शिक्षण घेत हे तिघे मोठे झाले. यामुळे साहजिकच आजी-आजोबांचा त्यांना लळा लागला. यामुळे मूळच्या हेंद्रन (ता.धुळे) गावापेक्षा त्यांची बोरविहिर गावाशी नाळ अधिक घट्ट जुळली होती. प्रजासत्ताक दिनाच्या उंबरठ्यावर चंदू चव्हाणची सुटका होत असल्याने सहाजिकच देशवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “चंदू पाकिस्तानच्या ताब्यात होता. भारत सरकारकडून चंदूच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु असले तरी प्रत्यक्ष तो भारतात सुखरूप येईलच याबद्दल साशंकता होती. पण आज चंदूची सुटका करण्यात आली आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे चंदूला आणण्यासाठी वाघा सीमेवर पोहोचले. चंदूचा ताबा घेण्यासाठी सर्व सरकारी सोपस्कार पार पाडण्यात येतील, अशी माहिती भामरे यांनी स्वतः मोबाईलवरून दिल्याचे चंदूचा भाऊ भूषण यांनी सांगितले. चंदू चव्हाणची सुटका झाल्याची माहिती भूषण चव्हाण याने आपले आजोबा चिंधा पाटील आणि ग्रामस्थांना दिली. ही वार्ता ऐकून या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्वत्र फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थांनी चिंधा पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. ‘प्रत्यक्षात चंदू गावात आलेला नाही, तो भारतात प्रवेश करण्यासाठी वाघा सीमेवर आहे, असे भूषण आणि चंदूचे आजोबा चिंधा धोंडू पाटील यांना घरासमोर जमलेल्या ग्रामस्थांना सांगावे लागले. गावातील चौकाचौकात सुरु झालेले संगीत, नृत्य व जल्लोष असे वातावरण जवान चंदू व अन्य सैनिकांवरचे निस्सीम प्रेम दर्शवत होते. या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेकांनी बोरविहिर गावाची वाट धरली होती.

आपल्या भावाची सुखरूप सुटका झाली याचा मला खूप आनंद झाला आहे. भारत सरकार आणि खास करून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे आपण मनःपूर्वक आभार मानतो. भारत सरकारने चंदूच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न आम्ही स्वतः पाहिले आणि अनुभवले आहे. यामुळे अधिकाधिक देशाभिमान जागा झाला, अशी प्रतिक्रिया चंदूचा भाऊ भूषण याने व्यक्त केली. चंदू कधी घरी येतो असे झाले आहे. त्याची पाकिस्तानने सुखरुप सुटका केली यामागे भारत सरकार आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा मोठा प्रयत्न होता. भारत सरकार आणि संरक्षण विभागाचे आपण कायम ऋणी राहू, अशी प्रतिक्रिया चंदू चव्हाणचे आजोबा चिंधा पाटील यांनी व्यक्त केली. चंदू चव्हाण बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्याची आजी लिलाबाई चिंधा पाटील यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. आजींचे अस्थीविसर्जन चंदू याच्या हातून करायचे, असे आम्ही ठरविले आहे. यामुळे आजीच्या अस्थी आजही जपून ठेवल्या आहेत. सरकारने चंदूला एका दिवसासाठी घरी येण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही केली आहे. एका दिवसासाठी चंदू आला की आजीच्या अस्थीचे त्याच्या हस्ते विसर्जन करू, अशी माहिती चंदूचा भाऊ भूषण याने दिली.