२०१५ वर्षांच्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या २०१६ या वर्षांत शहरातील गुन्हेगारीचा आलेख काहिसा कमी झाला असतानाच दुसरीकडे योग्य तपासामुळे गुन्हा सिध्दतेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होऊन गुन्हेगारांना शिक्षा होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, खासगी वाहतुकीच्या विळख्यात सापडलेल्या मुंबई नाका, ठक्कर बाजार, द्वारका चौक आदी भागातील वाहतुकीच्या समस्येवर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. तसेच रिक्षा मीटर, शेअर रिक्षा व तत्सम नागरिकांसाठी त्रासदायक ठरलेल्या विषयांवर तोडगा काढण्यासाठी पोलीस पुढाकार घेणार आहेत. शहरात वर्षभरात दाखल झालेले गुन्हे, त्यांचा तपास आणि गुन्हे शाबीत होण्याचे प्रमाण या सर्वाचा लेखाजोखा पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी पोलीस उपायुक्त (गुन्हे) दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील व विजय पाटील यांच्यासह १३ पोलीस ठाण्यातील अधिकारी उपस्थित होते. वर्षभरात पोलिसांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी, आर्थिक गुन्ह्यात ठेवीदारांना मिळालेला दिलासा, नागरिक आणि पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी राबविलेल्या अनोख्या योजना यांची माहिती देण्यात आली. २०१५ वर्षांत हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, चेन स्नॅचिंग, दिवसा व रात्री घरफोडी, हाणामारी, फसवणूक, वाहन चोरी, अपहरण, शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आदी स्वरुपाचे एकूण ३६२० दाखल झाले होते. त्यातील २०६९ गुन्ह्यांचा यशस्वी तपास करण्यात आला. हे प्रमाण ५७ टक्के होते. २०१६ वर्षांत वेगवेगळ्या स्वरुपाचे एकूण ३५३८ गुन्हे दाखल झाले. दोन्ही वर्षांची तुलना करता ८२ गुन्हे कमी झाले. गुन्ह्यांचा यशस्वी तपास होण्याचे प्रमाण या वर्षांत पाच टक्क्यांनी वाढून ते ६२ टक्क्यांवर पोहोचले. या काळात एकूण २१९६ गुन्ह्यांचा यशस्वी तपास करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. जुगार अड्डे व तत्सम अवैध व्यवसायाविरोधातील कारवाईत २०१५ मध्ये १२४ गुन्हे दाखल झाले होते. २०१६ मध्ये या कारवाईत लक्षणीय वाढ झाली. या वर्षांत या स्वरुपाचे एकूण ३०६ गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध शस्त्र व देशी कट्टे बाळगण्याच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. २०१५ मध्ये पोलिसांनी २२ अवैध शस्त्र जप्त केली होती. २०१६ मध्ये ५१ देशी कट्टे जप्त करण्यात आले. गुन्हेगारी आटोक्यात राखताना पोलिसांनी गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत केले. यामुळे या वर्षांत गुन्हा शाबीत होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले. जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांमध्ये गुन्हा सिध्दतेचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले आहे. २०१५ मध्ये या न्यायालयात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी २५.३१ टक्के गुन्हे सिध्द होऊन गुन्हेगारांना शिक्षा झाली. २०१६ मध्ये विशेष प्रयत्न केल्यामुळे हे प्रमाण ४०.१६ टक्क्यांवर पोहोचले. सत्र न्यायालयात गुन्हा सिध्दतेचे प्रमाण वाढविण्यात तपास यंत्रणेला यश आले. २०१५ मध्ये या न्यायालयात १५.५८ टक्के गुन्हे शाबीत होऊन गुन्हेगारांना शिक्षा झाली. २०१६ वर्षांत हे प्रमाण २१.५७ टक्क्यांवर नेण्यात आल्याचे सिंघल यांनी सांगितले.