वृक्षांच्या वयोमानाबाबत साशंकता महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या वृक्ष गणनेंतर्गत आतापर्यंत नऊ लाख २१ हजार २९८ वृक्षांची गणना पूर्णत्वास गेली असून त्यामध्ये शहरात २१ वर्षांहून अधिक वय असलेल्या वृक्षांची संख्या केवळ २१ हजार ९५२ इतकीच असल्याचे समोर आले आहे. पालिकेने हे काम झाडांच्या बुंध्याचा घेर पाहून केले की उंची विचारात घेऊन, असा प्रश्न पर्यावरणप्रमींनी उपस्थित केला आहे. महापालिकेने मात्र जीवशास्त्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विहित निकषानुसार हे झाल्याचा दावा केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने वृक्ष गणनेचे काम हाती घेतले आहे. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून चालू वर्षांअखेरीसपर्यंत ते पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. तथापि, आतापर्यंत झालेले काम लक्षात घेतल्यास पुढील आठ महिन्यात ते पूर्ण होईल की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. महापालिका हद्दीत आतापर्यंत झालेल्या वृक्ष गणनेत एकूण १४५ वृक्षांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यापैकी ११ औषधी गुणधर्म असलेल्या प्रजाती तर ४० फळझाडांच्या प्रजाती आहेत. तसेच दुर्मिळ वृक्षांच्या ३७ प्रजाती आढळून आल्या आहेत. या प्रजातीच्या वृक्षांची संख्या कमी आहे. त्यात रुद्राक्ष, महारुख, माकड लिंबू, दांडुस, शेंद्री, वारस, मुचकुंद, सुरंगी, साई-आवळा, रबर ट्री आदींचा अंतर्भाव असल्याचे वृक्ष प्राधिकरण विभागाकडून सांगण्यात आले. महापालिका हद्दीत एकूण ३१ प्रभाग असून त्यापैकी १३, १४, १५ व १६ या प्रभागातील वृक्षगणना पूर्ण झाली आहे. सध्या प्रभाग क्रमांक १, ६, २३, २४ व ३१ या प्रभागात हे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंतच्या गणनेत पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक एकमध्ये म्हसरुळ शिवारात सर्वाधिक तीन लाख ७८ हजार २२ वृक्ष आढळून आले. त्या खालोखाल प्रभाग क्रमांकमध्ये मखमलाबाद शिवारात दोन लाख ५४ हजार वृक्ष आढळले आहेत. या सर्वेक्षणात संबंधित झाडांचे वयोमानही काढण्यात आले. त्यात ११ ते २० वयोगटातील वृक्षांची संख्या सर्वाधिक तर २१ वर्षांपुढील वृक्षांची संख्या सर्वात कमी असल्याचे पालिकेने म्हटले आहे. ११ मीटर उंचीपेक्षा अधिक उंच असणारी पाच हजार ६३२ वृक्ष असून सात ते दहा मीटर उंचीदरम्यान तीन लाख ७७ हजार ९४६ वृक्ष आढळून आले आहेत. झाडांचे वयोमान काढण्याच्या पध्दतीवर काही पर्यावरणप्रेमींनी शंका उपस्थित केल्या आहेत. प्रत्येक झाडाचे वयोमान काढण्याचे निकष वेगवेगळे असतात. सर्वसाधारणपणे झाडाची तीन वर्षांत वाढ होते. चेरीसारखे झाड अल्पावधीत १५ फूटपर्यंत उंची गाठते तर वड व पिंपळसारख्या झाडांची वाढ अतिशय संथपणे होते. त्यामुळे महापालिकेने झाडांची उंची लक्षात घेऊन की त्यांच्या बुंध्याचा घेर लक्षात घेऊन वयोमान काढले याची स्पष्टता होणे आवश्यक आहे. प्रत्येक झाडाचे वयोमान काढण्याचे निकष वेगवेगळे असतात. त्यानुसार ही प्रक्रिया राबविली गेली असावी याबद्दल साशंकता आहे. वृक्षगणनेत महापालिकेला जीवशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत घेता आली असती. जेणेकरून झाडांच्या संगोपनाची जाणीव युवापिढीत रुजविता आली असती. - आनंद बोरा (अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक) वृक्षगणनेच्या कामात जीवशास्त्रातील तज्ज्ञांचा सहभाग आहे. झाडांचे वयोमान काढण्यासाठी जे काही निकष आहेत, त्यानुसार ही प्रक्रिया केली जात आहे. झाडांची उंची व बुंध्यांचा घेरही त्यात विचारात घेतला जातो. विहित निकषानुसार प्रत्येक झाडाचे वयोमान निश्चित केले जात आहे. ज्या झाडांची मोजणी पूर्ण होत आहे, त्यावर तसे नोंदविले जात आहे. गुगलवरही वृक्ष गणनेची नोंद होणार आहे. त्यामुळे नागरिकांना ही सर्व माहिती पाहता येईल. महापालिकेच्या संकेतस्थळावरही वृक्ष गणनेची माहिती देण्यात आली आहे. - भास्कर मोरे (प्रभारी उद्यान अधीक्षक, महापालिका)