नाशिक जिल्ह्यात भारतीय विद्यार्थी सेना आणि पर्यायाने शिवसेनेची पाळेमुळे रोवण्यात महत्वाची भूमिका निभावणारे नेते अॅड. अभय लक्ष्मण उगावकर (५१) यांचे शुक्रवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. एनबीटी विधी महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले उगावकर हे १९८७ पासून विद्यार्थी सेनेशी जोडले गेले. विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्षपदी त्यांनी अतिशय धडाडीने काम केले. त्यावेळी राज ठाकरे यांचे अतिशय विश्वासू गटातील ते मानले जात. १९९५ मध्ये भाजप-सेना युतीचे सरकार राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर निवड मंडळाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. स्थानिक बेरोजगार युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी या माध्यमातून प्रयत्न केले. शिवसेनेने कामाची दखल घेऊन त्यांची उपनेतेपदी निवड केली होती. पुढील काळात त्यांना काही व्याधींनी ग्रासले. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते दूर राहिले. मनसेची स्थापना झाल्यावर राज ठाकरे यांच्यासमवेत ते त्या पक्षात जाणार अशीही चर्चा होती. परंतु, तब्येतीत सुधारणा झाल्यावर काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन सेनेतच काम करण्याची तयारी दर्शविली. शिवसेनेत त्यांचा प्रवेशही झाला. शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल अॅड. लक्ष्मण उगावकर, पत्नी, दोन मुले व बहिणी असा परिवार आहे. कल्याणी पतसंस्थेच्या अध्यक्षा अंजली पाटील यांचे ते बंधू होत. या घटनेची माहिती समजल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व आप्त मित्रांनी पंडित कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. सायंकाळी अंत्ययात्रा काढण्यात आली. शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.