राज्यात सर्व शिक्षा अभियान, निरंतर शिक्षण अशा संकल्पनेतून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बालकांना किमान प्राथमिक शिक्षण मिळावे, यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिक्षण विभागासमोर आजही शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांचा प्रश्न उभा आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान जाहीर केले. मात्र याबद्दल शिक्षण विभागच अनभिज्ञ असल्याचे प्रकर्षांने जाणवत आहे. ‘विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापासी, आहे तो खरा धनवान’ अशा शब्दात महापुरुषांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले असले, तरी शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर १६ टक्के विद्यार्थ्यांची गळती नित्याची आहे. या पाश्र्वभूमीवर, ‘गेट झिरो’ शक्य नसल्याने ही गळती ५ टक्क्यांवर आणण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने अलीकडेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा अभियानाची आखणी करण्यात आली. अभियानाच्या पहिल्या टप्पात ३ ते २६ जानेवारी कालावधी निश्चित करण्यात आला. त्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे, मुलींमध्ये वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करताना गळती कमी करण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांची संख्या चार हजार ५०० इतकी आहे. त्यात मुलींची संख्याही मोठी आहे. शासकीय अध्यादेश मिळताच शिक्षण विभागाने जिल्हा परिषद, महापालिका शाळेचे मुख्याध्यापक, खासगी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना त्याची प्रत सोपविली. याविषयी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी सर्व मुख्याध्यापकांना अध्यादेशाबाबत अवगत करण्यात आल्याचे नमूद केले. त्यानुसार त्यांनी प्रबोधन करावे ही अपेक्षा असून याबाबत अहवाल मागविण्यात आला आहे. पालिकेचे शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी शासकीय अध्यादेशानुसार काम सुरू झाले असून याबाबत पुन्हा सर्वेक्षण करत शाळाबाह्य़ मुलींचा शोध घेतला जात असल्याचे नमूद केले. शाळाबाह्य़ तसेच शालेय स्तरावर मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याकडे कल असल्याचे सांगितले.वास्तविक अभियानाची व्याप्ती, उद्दिष्टे आणि जिल्हा स्तरावर सुरू असलेल्या कामाची पद्धत पाहता शिक्षण विभागाला कागदी घोडे नाचविण्यात स्वारस्य असल्याचे अधोरेखित होते. शाळाबाह्य़ मुलींचा शोध घेताना स्थलांतरित कामगारांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेची मदत घेतली नाही. बालकामगारांचा विचार केला गेला नाही. त्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेता अभ्यासक्रमात काही अंशी बदल करणे, पालकांचे समुपदेशन झाले नसल्याचे दिसते. सावित्रीबाई फुले जयंतीला प्रभात फेरी , शिक्षणाचे महत्त्व यावर व्याख्यान व सर्वेक्षण यावर शिक्षण विभागाची सर्व भिस्त असल्याने अभियानाच्या उद्देश साध्य होईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.