सलग चार दिवसांपासून सुरू असलेली संततधार कायम असली तरी गंगापूर धरणातील विसर्ग कमी केला गेल्यामुळे शहरातून मार्गस्थ होणाऱ्या गोदावरीची पूरस्थिती काहीअंशी ओसरली. मागील चोवीस तासात जिल्ह्यात ४८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील निम्मी धरणे आधीच भरली आहेत. भावलीपाठोपाठ सोमवारी आळंदी धरणही ओसंडून वाहू लागले. दारणा, गंगापूर, कडवा, वालदेवी, पुणेगाव या धरणांमधून विसर्ग सुरू असला तरी त्याचे प्रमाण कमी झाले. यामुळे नदीकाठालगत निर्माण झालेला धोका काहीसा कमी झाला. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात १० हजार १५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच काळात ६८७० मिलिमीटर पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण ३२८६ मिलिमीटरने अधिक आहे.

शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात हजेरी लावणारा पाऊस काही भागांचा अपवाद वगळता सोमवारी कायम राहिला. रविवारी गंगापूर धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडल्यामुळे गोदावरीला पूरस्थिती निर्माण झाली. पात्रातील अनेक मंदिरे, रामसेतू पूल पाण्याखाली बुडाले. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नदीकाठावरील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी सुरू केली. गोदावरी नदीचा पूर प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर येथे पडणारा आणि नाशिक शहरात पडणारा पाऊस यावर अवलंबून असतो.

Kalamboli, 8 thousand Electricity Consumers , Left Without Power , for Hours, Accidental Power Line Cut, kalamboli no electricity, kalamboli electricity cut,
कळंबोलीतील ८ हजार विजग्राहक सात तास विजेविना
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा
March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा

रविवारी सायंकाळी गंगापूरमधून सुमारे १४ हजार क्युसेक्सपर्यंत विसर्ग केला गेला होता. त्या वेळी शहरातील पावसाचे पाणी गोदापात्रात एकत्रित आल्याने पातळीत लक्षणीय वाढ झाली. सोमवारी हे चित्र मात्र बदलले. नाशिकमध्ये सायंकाळपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर काहसा ओसरला. यामुळे गंगापूरमधील विसर्ग कमी करण्यात आला. दुपारी या धरणातून केवळ ५०९४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता. संततधारेने आळंदी धरणही तुडुंब भरून वाहू लागले. आळंदी नदीचे पाणी गोदावरीला येऊन मिळते. होळकर पुलाखालून नऊ हजार १३३ क्युसेक्स पाणी वाहत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आदल्या दिवशीच्या तुलनेत पाण्याची पातळी बरीच कमी झाल्याचे पाहावयास मिळाले.

मागील चोवीस तासात जिल्ह्यात ४८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात (१०७ मिलिमीटर) तर सर्वात कमी मालेगाव तालुक्यात (५) झाला. नाशिक २८, दिंडोरी ३३, पेठ ६८, त्र्यंबकेश्वर ६७, नांदगाव १७, चांदवड १६, कळवण २९, बागलाण सहा, सुरगाणा ५५, देवळा ९.४, निफाड १७.६, सिन्नर १६, येवला ७ मिलिमीटरची नोंद झाली. गोदावरी नदीप्रमाणे दारणा, कडवा, कादवा, वालदेवी नद्यांची पातळी कमी झाली. दारणा, कडवा, वालदेवी, पालखेड, पुणेगाव या धरणांचा विसर्गही कमी करण्यात आला. धरणांमधून सोडलेले पाणी उपरोक्त नद्यांद्वारे अखेर नांदुरमध्यमेश्वर येथे गोदावरीला येऊन मिळते. नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ते जायकवाडीसाठी सोडले जाते. या बंधाऱ्यातून ६१ हजार १३८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता.

धरण साठा ५९ टक्क्यांवर

पावसाने धरणांच्या साठय़ात कमालीची वाढ झाली. अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने पाऊस झाल्यास लगेच पाणी सोडावे लागते. भावलीपाठोपाठ आळंदी धरण ओसंडून वाहू लागले. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४३३३ (७७ टक्के) जलसाठा झाला आहे. काश्यपी १५८० (८५), गौतमी गोदावरी १४२९ (७६), आळंदी ९५४ (९८), पालखेड ४९० (७५), करंजवण ३१८६ (५९), वाघाड १८७८ (८२), ओझरखेड ८६५ (४१), पुणेगाव ४०८ (६५), तीसगाव १०८ (२४), दारणा ५७८७ (८१), भावली १४३४ (१००), मुकणे ३४६३ (४८), वालदेवी ११३३ (८५), भोजापूर ३०१ (८३), चणकापूर १५३४ (६३), हरणबारी ९९९ (८६), केळझर ३४२ (६०), गिरणा ६२८८ (३४), पुनद ६६३ (५१) असा साठा झाला आहे. बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर असताना माणिकपुंज व नागासाक्या मात्र कोरडे आहेत. जिल्ह्यातील लहान-मोठय़ा धरणांची एकूण ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट जलसाठय़ाची क्षमता आहे. सद्यस्थितीत या धरणांमध्ये ३८ हजार ६१६ दशलक्ष घनफूट अर्थात ५९ टक्के जलसाठा झाला आहे. गतवर्षी हे प्रमाण केवळ ४० टक्के होते. म्हणजे यंदा १९ टक्क्यांनी अधिक जलसाठा आहे.