आरोग्य यंत्रणेकडून सूचना उन्हाच्या वाढत्या तीव्रतेला पुढील दोन दिवस तोंड द्यावे लागणार असल्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. या पाश्र्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने उष्माघातापासून बचाव कसा करता येईल या दृष्टीने उपाय योजना सुरू केल्या असून आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. सरकारी रुग्णालयांत उष्माघात रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर फिरणे टाळावे, उष्माघाताची लक्षणे दिसल्यास आपत्कालीन आरोग्य सेवेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा मार्च महिन्यात टळटळीत उन्हाचे चटके बसत असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. पाच दिवसांपासून तापमानाने चाळीशी ओलांडल्यानंतर आरोग्याच्या अनेक तक्रारींनी डोके वर काढले आहे. लहान मुले व आबालवृद्धांना दाहकतेचा प्रकर्षणाने त्रास होत असून यापासून बचाव व्हावा, उष्माघाताने कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, महापालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील कक्ष, आरोग्य विभाग यांनी एकत्रितपणे उष्माघातापासून बचाव व्हावा यासाठी पत्रके, फलक यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. कामाशिवाय दुपारी १२ ते सायंकाळी चार या कालावधीत कोणी उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आरोग्य विभाग सतर्क असून उष्माघाताची लक्षणे जाणवत असल्यास आपत्कालीन आरोग्य सेवा अर्थात १०८ रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा. मात्र या कालावधीत रुग्णाला होणारा त्रास कमी व्हावा यासाठी प्राथमिक उपचार करण्याची सूचना विभागाने केली आहे. उन्हापासून बचाव करणारे गॉगल्स, टोपी, स्कार्फ, स्टोल, सनकोट यासह काही सौंदर्य प्रसाधने यांची मागणी वाढल्याने विक्रेते खूश आहेत. काय करावे.. जास्तीत जास्त पाणी प्यावे हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावे बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, ओल्या कपडय़ांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते हे पाहून ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक प्यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, उन्हाचा त्रास होण्याची चिन्हे पाहत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवत त्यांना मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध करून द्यावे. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावे. जागोजागी पाणपोई उभारावी. काय करू नये. लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात बसवू नये. दुपारी १२ ते साडे तीनच्या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. शारीरिक श्रमाची कामे टाळावी. ज्वलनशील पदार्थ सुरक्षित ठिकाणी ठेवावे.