शंकराचार्य असूनही पोलीस प्रशासन आपली जाणुनबुजून अडवणूक करत आहेत. आपल्या मोटारीवरील लाल दिवा काढण्यात आला. इतर राज्यात आपणास राज्यमंत्र्याचा दर्जा असतांना महाराष्ट्र पोलीस कस्पटासमान वागणूक देत असल्याचा आरोप करत यामागे कोण कार्यरत आहे, याचा छडा लावण्यात यावा अशी मागणी शारदा व ज्योतिषपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केला. प्रशासनाने दिलेल्या सापत्न वागणुकीचा पाढा त्यांनी वाचला. दरम्यान, या प्रकारामागे शिर्डीच्या साईबाबांना शंकराचार्याकडून असणारा विरोध कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. शंकराचार्य सातत्याने शिर्डीच्या साई संस्थानविरोधात तोफ डागत असल्याने त्यांची अडवणूक करण्याचे धोरण अवलंबिल्याची चर्चा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यातील शाही स्नानात शंकराचार्य प्रथमच सहभागी झाले. पहिल्या पर्वणीसाठी १४ ऑगस्टपासून जिल्हा प्रशासनाकडे शंकराचार्यानी स्नानासाठी वेळ, मार्ग याची निश्चिती करावी, यासाठी प्रतिनिधीमार्फत पाठपुरावा केला. मात्र त्यास उत्तर मिळाले नाही. नंतर जिल्हा प्रशासनाने तोंडी उत्तर देत स्नान करता येईल असे सांगितले. आखाडय़ांनी चार वाजेपूर्वी स्नान झाले तर हरकत नसल्याचे नमूद केले होते. त्यानुसार आपण कुशावर्ताकडे स्नानासाठी रवाना झालो. स्नानाची वेळ होईपर्यंत गौतम तलावाजवळील बालाजी येथे थांबायचे होते. परंतु, सोबत असणाऱ्या पोलीस पायलट कर्मचाऱ्यांना रस्ता माहीत नसल्याने ते मागे राहिले. लाल दिव्याच्या मोटारीतुन आपण पुढे निघालो. मात्र, आपली मोटार पोलीस उपअधीक्षक प्रवीण मुंढे आणि बडगुजर या अधिकाऱ्यांनी रोखून धरली. मध्यप्रदेशची गाडी असे कारण पुढे करत लाल दिवा काढून घेण्यात आला.  आपल्याशी बोलणे झाल्यावर मोटारीला पुढे जाऊ दिले गेले. गौतम तलावावर पुन्हा एकदा अडवणूक झाली. हा प्रकार संशयास्पद असल्याचे शंकराचार्यानी नमूद केले. यामागे नेमकी कोणती अदृश्य शक्ती आहे, त्याचा छडा लागणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुढील पर्वणीसाठी शंकराचार्याना स्नानासाठी अद्याप स्वतंत्र वेळ किंवा परतीचा मार्ग या विषयी काहीच माहिती दिली गेलेली नाही. या स्नानावर कोणाची हरकत असल्यास आपण शाहीस्नान करणार नाही, असे शंकराचार्यानी सांगितले.