नाशिक ते इतरत्र एसटी प्रवासात सर्वसाधारण २० रुपयांची वाढ नवरात्र आणि दसरा संपल्यानंतर साऱ्यांना वेध लागतात ते दिवाळीचे. दीपोत्सव मूळ गावी साजरा करण्याकडे अनेकांचा कल असतो. याच काळात मिळणाऱ्या सुटय़ा लक्षात घेऊन पर्यटनाची संधीही साधली जाते. यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षणीय वाढते. या काळात राज्यात एसटी बसचा प्रवास प्रवाशांना महाग पडणार आहे. एसटीच्या सर्वसाधारण प्रवास भाडे २० रुपयांनी वाढणार आहे. दिवाळीतील सुटीच्या हंगामात बस, रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होते. खासगी वाहतूकदार या काळात अव्वाच्या सव्वा दर वाढवून प्रवाशांची लूटमार करतात. मागील काही वर्षांपासून एसटी महामंडळही जादा बसगाडय़ा उपलब्ध करून तात्पुरत्या स्वरूपात दरवाढ करत आहे. या वर्षीच्या दिवाळीत ही परंपरा कायम राहणार आहे. एसटी महामंडळाने यात्रा, सणासुदीचा काळ, दिवाळी सुटी तसेच सप्ताहअखेर होणारी गर्दी लक्षात घेत भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. त्याची झळ प्रवाशांना सहन करावी लागणार आहे. १४ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बससाठी १० टक्के, निमआरामसाठी १५ टक्के, तर वातानुकूलित बससाठी २० टक्के भाडेवाढ केली आहे. यामुळे एरवी सर्वसाधारण जलद बसमधून मुंबईला जाण्यासाठी १९५ रुपये भाडे लागत होते, त्यात या काळात २० रुपये, निमआरामसाठी २६७ वरून ३०२ म्हणजे ३५ रुपये आणि रातराणीसाठी २३१ रुपयांवरून २५४ अर्थात २३ रुपये अधिक मोजावे लागतील. याच धर्तीवर नाशिकहून राज्यात इतर ठिकाणी जाण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. साधी, जलद, रात्रसेवा या बसच्या भाडय़ात साधारणत: १० टक्के, निमआराम बससाठी १५ टक्के, तर वातानुकूलित शिवनेरी, वातानुकूलित शिवशाही आणि वातानुकूलित शिवशाही शयनयान बससेवेत २० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. भाडेवाढीची झळ मात्र ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना बसणार नाही. त्यांना ग्रामीण बसमध्ये अर्धे प्रवासभाडे पूर्वीप्रमाणे राहील. तसेच या मार्गावर उपटप्पांची सवलत ही ३० किलोमीटर पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्यात आली आहे. वार्षिक सवलत कार्डावर १० टक्के सवलत देण्यात आली असून, विविध घटकांना पूर्वीप्रमाणेच सवलत देण्यात येईल. या भाडेवाढीमुळे दिवाळीतील प्रवास चांगलाच महाग पडणार असल्याचे लक्षात येते. नाशिक-पुणे (निमआराम) आणि शिवनेरी सेवा, नाशिक-धुळे विनावाहक सेवेसाठी ठोक भाडे आकारले जाईल, असे महामंडळाने म्हटले आहे.