असुविधांमुळे पर्यटक त्रस्त गोदावरी व कादवा नदीच्या संगमावरील नांदुरमध्यमेश्वर धरण परिसर महाराष्ट्राचे भरतपूर अर्थात पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र या अभयारण्याची दुरवस्था झाली आहे. अभयारण्य परिसरात सोयी-सुविधांअभावी पर्यटक व पर्यावरणप्रेमींना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत लागत आहे. निवासी तंबूत साप शिरणे, शौचालयाची दुरवस्था यासह अन्य अडचणींचा सामना पर्यटकांना सामना करावा लागत आहेत. गोदा व कादवा नदीच्या किनारी प्रवाहात गाळ साचल्याने उंचवटे तयार झाले. जलाशयातील उथळ पाणी, विपुल जलचर, विविध पाण वनस्पती, किनाऱ्यालगतच्या परिसरात वृक्षराई, सभोवतालच्या शेतातील हिरवीगार पिके ही एकूणच स्थिती पाहता नांदुरमध्यमेश्वर हे पक्ष्यांचे अधिवासाचे ठिकाण बनण्यास कारक ठरले आहे. दिवाळीनंतरच्या थंडीची तीव्रता जशी वाढत आहे, तसे या ठिकाणी पक्षी संमेलन भरण्यास सुरुवात झाली आहे. सद्य:स्थितीत परिसरात १५ हजार हून अधिक प्रकारच्या पक्ष्यांची होणारी नोंद हे त्याचे निदर्शक. यामध्ये कॉमन करेन, स्पून बिल, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, पर्पल मूरहेन, जाकाना, मार्श हेरीअर, ग्रेब, कॉमन कुट, पोर्चाड डक आदींसह ग्रास बर्ड हे पक्षी बघावयास मिळतात. जवळपास ४०० हून वनस्पतीची विविधता असणाऱ्या परिसरात पक्ष्यांसोबत कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटय़ा, विविध प्रकारचे साप, कासव आदी वन्यचर आहेत. जलाशयात २४ प्रकारचे मासे आहेत. विविध रंगसंगती, मनोहारी सौंदर्य ल्यालेले नानाविध पक्षी येथे पाहावयास मिळतात. त्यामुळे हिवाळा म्हटला की, नाशिकसह राज्यातील पक्षीप्रेमींची नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात दरवर्षीची सहल ठरलेली असते. हे क्षेत्र शासनाच्या मालकीचे असून त्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक कार्यालयाकडून व्यवस्थापन केले जात आहे. पर्यटकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन या परिसरात पक्षी निरीक्षणासाठी पाच मनोरे उभारलेले आहेत. इतकेच नव्हे तर, पर्यटकांना मोफत स्वरूपात दुर्बिणीची उपलब्धता करून पक्षी न्याहाळण्याची सुविधा, वास्तव्य करू इच्छिणाऱ्यांसाठी तंबू व विश्रामगृह, तसेच अस्सल गावराण भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आली. वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे वन विभाग सांगते. स्थानिक ‘गाइड’मार्फत पर्यटकांना पक्ष्यांची ओळख करून दिली जाते. तसेच पक्षी निर्वाचन केंद्रावर वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती दिली जात आहे. असुविधेसह पर्यटकांच्या जीवितास धोका प्रशासन मुबलक स्वरूपात सोयी-सुविधा देत असल्याचा दावा करत असले तरी दुसरीकडे, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. स्वच्छतागृहातील अस्वच्छता आणि दरुगधीमुळे त्याकडे कोणी फिरकत नाही. पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी उभारलेल्या तंबूत अधूनमधून सापाचाही शिरकाव होतो. यामुळे वास्तव्यास असणाऱ्या पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पर्यटकांच्या गोंधळामुळे पक्ष्यांना त्रास होत असून जी केंद्रे वन विभागाने पाहणीसाठी ठरवून दिली, त्या ठिकाणी पक्षी येत नाही. मासेमाऱ्यांचा या ठिकाणी मुक्त वावर असून त्यांच्या जाळ्यामुळे अनेक पक्षी जखमी अथवा मृत होतात. पक्षी काही कारणास्तव जखमी झाले तर त्यांसाठी ‘मदत केंद्र’ नाहीच, पण कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारीही नियुक्त नाही. वन विभागाने स्थानिक युवकांना हाताशी धरत ‘गाइड’ तयार केले. पण त्यांना मानधनदेखील दिले जात नाही. या क्षेत्राची जबाबदारी वन विभागाच्या चार कर्मचाऱ्यांवर आहे. असुविधा पर्यटक व पक्ष्यांसाठी अडचणीच्या ठरल्या असून वन विभागाने त्याकडे लक्ष देण्याची गरज पर्यटक व्यक्त करत आहे.