गोदावरीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदी प्रवाही राहणे आवश्यक आहे. गंगापूर धरणाच्या वरील भागात अधिक क्षमतेचे धरण बांधून गोदावरीला प्रवाही ठेवता येईल. या धरणासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. गोदावरी नदीच्या प्रदूषण निर्मूलनासाठी खुद्द पर्यावरणमंत्र्यांनी मांडलेल्या तोडग्यावर हसावे की रडावे, अशी पर्यावरणप्रेमींची अवस्था झाली आहे. गोदावरी नदीवर या पट्टय़ात नवीन धरण बांधण्यास प्रतिबंध आहे. यामुळे कितीही वाटले तरी धरण अस्तित्वात येणे अशक्य आहे. पर्यावरणमंत्र्यांनी गटारीचे पात्रात मिसळणारे पाणी, कँक्रिटीकरणामुळे नदीचा गुदमरलेला श्वास यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी नदी प्रवाही ठेवून प्रदूषण मुक्ततेचा पर्याय सुचविल्याने गोदावरीला प्रदूषणाच्या जोखडातून सोडविण्यासाठी धडपडणारे अवाक् झाले आहेत. गुरुवारी कदम यांनी गोदावरीच्या स्थितीची रामकुंड, तपोवन व घारपुरे घाट परिसरात भेट देऊन पाहणी केली. तसेच महापालिकेच्या तपोवन येथील मैला व सांडपाणी व्यवस्थापन केंद्राची भेट देऊन माहिती घेतली. मंत्री महोदय या परिसरास भेट देणार असल्याचे समजल्यानंतर पालिकेची धावपळ उडाली. महोदय पाहणी करत असताना नदी स्वच्छतेचे काम इमानेइतबारे केले जात असल्याचे दर्शविले गेले. भाजी विक्रेत्यांना काही काळासाठी काठावर दुकान थाटण्यास मज्जाव करण्यात आला. या पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आ. प्रा. देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन, पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आदी उपस्थित होते. गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी र्सवकष उपाय करावेत, असे निर्देश कदम यांनी दिले. नदी प्रदूषणास प्लास्टिक पिशव्या मोठय़ा प्रमाणात कारणीभूत असल्याचे दिसून येते. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवरील र्निबधांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सूचित केले. दोषींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. याबाबतचा अहवाल दर दोन महिन्यांनंतर शासनास सादर करावा. गोदावरी नदी प्रवाहित राहिल्यास प्रदूषण नियंत्रणात राहील. गंगापूर धरणातून पाणी सोडण्यावर मर्यादा आहेत. यामुळे गोदावरी प्रवाही ठेवण्यासाठी गंगापूर धरणाच्या वरील भागात नवीन धरण बांधण्याची आवश्यकता त्यांनी मांडली. या धरणासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. डवले यांनी सिंहस्थ काळात गोदावरीतील पाणी स्वच्छ राहावे यासाठी झालेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यातील काही प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा चांगला परिणाम दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद व नगरपलिका यांच्या साहाय्याने प्लास्टिक बंदीसाठी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले. पालिका आयुक्त कृष्णा यांनी नदीत सांडपाणी व कचरा रोखण्यास प्राधान्य दिले जात असल्याकडे लक्ष वेधले. केंद्र शासनाच्या साहाय्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येत्या काही महिन्यांत कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ नदी प्रदूषण रोखण्यासाठी होईल असे त्यांनी सांगितले. प्रशासनाकडून दिशाभूल गोदावरीवरील काँक्रिटीकरण आणि तत्सम बाबींवर प्रशासकीय यंत्रणांकडून पर्यावरणमंत्र्यांना दिशाभूल करणारी माहिती दिली गेली. गोदावरीच्या प्रदूषणावरील बैठकीला प्रदूषणाच्या विषयावर सातत्याने लढणाऱ्या आणि याचिका दाखल करणाऱ्यांना बोलावण्याचे औदार्य शासकीय यंत्रणांनी दाखविले नाही. प्रदूषण मुक्तीसाठी तात्पुरत्या व दीर्घकालीन उपायांची गरज आहे. नदी प्रवाहित करण्यासाठी गंगापूरला समांतर धरण बांधण्याची पर्यावरणमंत्र्यांनी केलेली घोषणा आश्चर्यकारक आहे. सांडपाणी पात्रात मिसळून नदी प्रदूषित होते. हे पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करणे, गोदापात्र स्वच्छ राखण्यासाठी विशिष्ट कालमर्यादेनंतर गंगापूर धरणातून पाणी सोडणे असे अनेक उपाय योजता येतील. गेल्या वर्षी दुष्काळामुळे धरणातून पाणी सोडता आले नाही. यंदा तशी स्थिती नसल्याची माहिती मांडून त्यावरील र्निबधही मागे घेता येतील. विविध उपायांवर काम करण्याऐवजी प्रशासकीय यंत्रणा निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. - देवांग जानी (अध्यक्ष, गोदा प्रेमी नागरी समिती)