नगरसेवकांच्या सूचनेप्रमाणे स्वच्छता निरीक्षकांनी काम करावे मलेरिया, डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी महापौर रंजना भानसी यांनी झाडाझडती घेतली. प्रभागनिहाय धूर फवारणी करताना स्वच्छता निरीक्षकांनी आता स्थानिक नगरसेवकांच्या सूचनेनुसार काम करावे. कोणत्याही भागात कचऱ्याचे ढीग साचणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापौरांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. गणेशोत्सवास दोन दिवसांत सुरुवात होत आहे. गणेशोत्सवात शहर परिसरात देखावे पाहण्यासाठी भ्रमंती करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. या काळात रोगराईला निमंत्रण मिळू शकते. हे लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली. महापौरांच्या बैठकीस आरोग्य व स्वच्छता विभागाचे प्रमुख अनुपस्थित होते. या बैठकीवेळी आयुक्तांच्या दालनात अन्य विषयांवर बैठक सुरू असल्याने संबंधितांना येता आले नाही, परंतु आरोग्य विभागातील इतर अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांकडून सद्य:स्थितीची माहिती घेण्यात आली. सहा विभागांत सध्या २८ लहान आणि सहा मोठय़ा अशा एकूण ३४ यंत्रांद्वारे धूर फवारणी केली जाते, तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ६२ पथकांच्या मदतीने घरोघरी तपासणी केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश आजाराचे आठ रुग्ण आढळले. चालू वर्षांत हा आकडा २१ असून वर्षभरात या आजाराने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गेल्या वर्षी १८७ जणांमध्ये डेंग्यूसदृश लक्षणे आढळली. त्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. गतवर्षीचा विचार करता या वर्षी डेंग्यूचे रुग्ण ७७ टक्क्यांनी कमी होऊन स्थिती सुधारल्याचा दावा करण्यात आला. मलेरियाचे आतापर्यंत १३ रुग्ण असून गतवर्षी हे प्रमाण १९ होते. त्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घर व परिसरात पाणी साचणार नाही याबद्दल प्रबोधन केले जात असल्याचे सांगण्यात आले. बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते, आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या कार्यशैलीच्या तक्रारी करण्यात आल्या. धूर फवारणीचे काम कागदोपत्रीच धूर फवारणीच्या मुद्दय़ावरून महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांना फैलावर घेतले. धूर फवारणीचे काम अधिक्याने कागदोपत्रीच होते. कुठे किती प्रमाणात धूर फवारणी झाली याची माहिती नाही. ज्या भागात फवारणी होते, तेथील नगरसेवकही अनभिज्ञ असतात, याकडे महापौरांनी लक्ष वेधले. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे नियमित काम न झाल्यास कचऱ्याचे ढीग साचतात. या स्थितीत ज्या प्रभागात धूर फवारणी व स्वच्छतेची कामे केली जातील, त्याची माहिती स्थानिक नगरसेवकांना देऊन त्यांच्या सूचनेनुसार कुठे फवारणी करावी या संदर्भात चर्चा करावी, असे महापौर भानसी यांनी सूचित केले. ही कामे झाल्यावर नगरसेवकांच्या स्वाक्षरीने आपला अहवाल स्वच्छता निरीक्षकांनी सादर करावा, असे निर्देश त्यांना देण्यात आले.