पोलीस आयुक्तांचे आवाहन

ध्वनि प्रदूषणास आळा बसावा तसेच रूग्ण आणि वयोवृध्दांना होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने शहरात काही महिन्यांपासून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वाहनधारकांमध्ये प्रबोधन करून दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’ उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमास वाहनधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत असून आता केवळ एकच दिवस नव्हे, तर प्रत्येक दिवस ‘नो हॉर्न डे’ म्हणून पाळण्याची गरज आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भातील निवेदनात आयुक्तांनी वाहनधारकांनी भोंगे न वाजविण्याचे फायदेही मांडले आहेत. विनाकारण भोंगा वाजविण्याची अनेक वाहनधारकांना सवय असते. भोंगा वाजविण्यामुळे ध्वनि प्रदूषणात वाढ होते. रूग्णालयाजवळ भोंगा वाजविण्यास मनाई असतांनाही बहुतांश वाहनधारक नियमाचे पालन न करता भोंगा वाजवित असल्याने रूग्ण आणि वृध्द मंडळींना त्याचा अधिक त्रास होतो. आयुक्त डॉ. सिंगल यांनी सर्व परिस्थितीचा विचार करून शहरात दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’ उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाविषयी प्रबोधनासाठी स्वत: आयुक्त रस्त्यावर उतरले. नाशिकच्या अनेक भागात वाहनधारकांना त्यांनी वारंवार भोंगा वाजविण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जाणीव करून दिली. हळूहळू वाहनधारकांकडूनही या उपक्रमास प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे हुरूप वाढलेल्या आयुक्तांनी आता प्रत्येक दिवस हा ‘नो हॉर्न डे’ असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

वाहतूक हा प्रत्येक शहराच्या प्रगतीचा आणि कार्यसंस्कृतीचा आरसा असतो. वाहनांची वर्दळ ही समृध्दीचे प्रतीक मानली तरी या समृध्दीला शिस्तीची किनार असणे हे भौतिक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रगतीचे द्योतक असल्याचे आयुक्तांनी निवेदनात म्हटले आहे. वाहनधारकाचे रस्त्यावरचे वर्तन, वाहतूक पोलिसांना सहकार्य, नागरिकांची काळजी, वाहन चालविण्याची पध्दत यावरुन त्याची मानसिक स्थिती लक्षात येते.

संयमित आणि सुसंस्कृत नागरिक वाहन चालवितांनादेखील सामाजिकतेचे भान ठेवत असतो. वैचारिकदृष्टय़ा पुढारलेली व्यक्ती कमीतकमी ध्वनि प्रदूषण किंबहुना वाहन चालवितांना किमान आवाज करणारे, भोंग्याचा मर्यादित वापर करणारी असते. ते त्यांच्यातील प्रगल्भतेचे, खऱ्या साक्षरतेचे लक्षण मानण्यात येते. सर्व गोष्टी समजून, उमजून घेतल्या की मग कोणास त्रास देणे होत नाही, हेच यातून स्पष्टपणे पुढे येते. कर्णकर्कश आवाज करणे हे उथळपणाचे आणि संयम नसल्याचे प्रतिक असल्याचा टोलाही आयुक्तांनी हाणला आहे. ध्वनि प्रदूषणाचा त्रास प्रत्येकाला होतो. मंजुळ आवाज हवाहवासा वाटतो. कानाला आणि मनाला त्रास देणारा आवाज प्रत्येकाला नकोसाच असतो. गाडय़ांच्या भोंग्याचा वापर कितपत करावा याचा विचार होणे गरजेचे आहे, असे आयुक्त म्हणाले.

‘नो हॉर्न डे’ पाळण्यामागे एक संकल्पना, विश्वास, दिलासा, शिस्त, स्वभाव, प्रगल्भता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे एक विचार आहे. हा विचार प्रत्येकाने स्विकारणे यातच सर्वाचे हित आहे. आपल्याकडे वाहन असतांना मिजास मिरविण्यासाठी भोंग्याचा  वापर योग्य नसल्याची समज आणि उमज वाहनधारकांना दिली पाहिजे. ‘नो हॉर्न डे’ अभियानाच्या प्रभावाचा विचार न करता सुरुवात निश्चितपणे करायला हवी. याचा कितपत प्रभाव होईल असा विचार करण्यापेक्षा आपले योगदान महत्वाचे याचा विचार करणे हे खरे नागरिकत्वाचे लक्षण आहे. नागरिक म्हणून समोरच्यांनाही दिलासा आणि स्वत:ला समाधान मिळेल अशी कृती आपल्याकडून अपेक्षित आहे. त्यामुळे या अभियानात सहभागी व्हा आणि सदैव ‘नो हॉर्न डे’ पाळा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

२००५ पासून आपण आजपर्यंत वाहनाचा भोंगा वाजविलेला नाही. शासकीय वाहनचालकांनाही भोंगा न वाजविण्याच्या सूचना दिलेल्या असून त्याचे कटाक्षाने पालन केले जाईल याची जागरुकता नेहमी आपण बाळगत असतो, हेही आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले आहे.

भोंगा न वाजविणे म्हणजे संयमता दृढ करणे

रस्त्यावर वावरतांना भोंगा न वाजविणे म्हणजे आपल्या अंगी असलेला संयम आणि संवेदना अधिक दृढ करणे होय, असे डॉ. सिंगल यांनी नमूद केले आहे. वाहतूक खोळंबली की आपण नकळत भोंग्याकडे हात नेऊन आपला संताप व्यक्त करतो, पण खरोखरच तसे केल्याने वाहतूक मोकळी होते, शिस्त लागते वा व्यवस्थित होते असे नाही. याउलट भोंग्याच्या मोठया आवाजाने लहान व ज्येष्ठांच्या कर्णपटलावर प्रतिकूल परिणाम होतात. तसेच चिडचिड वाढणे, मानसिक संतुलन बिघडणे यासारख्या तक्रारी डोकावू लागतात. बऱ्याचदा हे माहीत असूनही वाहनधारक भोंग्याचा अनाठायी उपयोग करीत असतात. सभ्य समाजाला शोभा न देणारे वर्तन समाजातील कोणत्याच घटकाकडून होऊ  नये आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदूषणरहीत वातावरण निर्माण व्हावे यादृष्टीने ‘नो हॉर्न डे’ पाळणे गरजेचे आहे, असे आयुक्तांनी सांगितले.