नैसर्गिक स्रोतातील पाणी वापरण्याचा प्रयोग यशस्वी; दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानचा शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू उन्हाळ्याला सुरुवात होत असतानाच पाणीटंचाईचे सावट दिवसागणिक गडद होत आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढत असून त्यावर कोटय़वधींचा निधी दरवर्षी खर्च होतो. या स्थितीत जिल्ह्यातील ६४ किल्ल्यांवरील शिवकालीन तळे आणि टाक्यांमधील पाणी पायथ्याशी असणाऱ्या गावातील तहान भागविण्यासाठी वापरता येईल. काही ठिकाणी ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेऊन गड-किल्ल्यांवरील नैसर्गिक स्रोतातील पाणी वापरण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. या संकल्पनेचा सर्वत्र अवलंब करून टंचाईची तीव्रता फारसा खर्च न करता कमी करता येईल, यासाठी दुर्गसंवर्धन प्रतिष्ठान शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करत आहे. शहर परिसरातील इगतपुरी, त्र्यंबक, दिंडोरी, सटाणा, चांदवड यासह अन्य तालुक्यात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६४ गड-किल्ले आहेत. हे सर्व किल्ले शिवकालीन असून त्या ठिकाणी दुष्काळसदृश स्थितीचा विचार करत तळे, टाक्या निर्मिलेल्या आहेत. सद्य:स्थितीत वेगवेगळ्या किल्ल्यांवर जवळपास २०० ते २५० तळी बुजलेल्या स्थितीत आहेत. बहुतांश किल्ल्यांजवळ धरण किंवा तलाव आहेत. भौगोलिक स्थितीचा विचार केल्यास किल्ल्यांवरील तळे व टाक्यांमधील पाणी पायथ्याशी असणाऱ्या बंधाऱ्यात साठवता येऊ शकते. सुरगाणा तालुक्यातील हतगडचा विचार केल्यास गडाच्या वरील भागात पाण्याची अनेक तळी आहेत. मात्र त्यातील काही तळी बुजलेली आहेत. हतगडच्या पायथ्याशी असणारी पाचहून अधिक गावे पाण्यासाठी तहानलेली असताना किल्ल्यावरील पाणी योग्य नियोजन करत खाली आणल्यास त्यांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करता येईल. सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर मुबलक पाणी आहे. किल्ल्याच्या सभोवताली पाचहून अधिक गावे आणि काही पाडे आहेत. हे पाणी शेती तसेच पिण्यासाठी वापरण्यासाठी खालील भागात बंधाऱ्यासारखा पर्याय शोधता येईल. रामशेज किल्ल्यावर १९ तळी असून त्यातील काही बुजलेली आहेत. ही तळी स्वच्छ केल्यास खालच्या भागातील गावांची तहान भागविता येईल.चांदवड हा तसा दुष्काळी तालुका. याच पट्टय़ातील इंद्राई-चंद्राई किल्ल्यासह अन्य किल्ल्यांवर नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. गिरणारेच्या वाघारे किल्ल्यावर कश्यपी नदीचा उगम आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. उन्हाळ्यात ग्रामस्थ किल्ल्यावर जाऊन पाण्याची गरज पूर्ण करतात. विश्रामगड येथे तलाव आणि तळी असून पाण्याचा साठा मुबलक आहे. या पाण्याचा वापर पट्टेवाडीचे ग्रामस्थ करतात. रासबरी किल्ल्यावर ग्रामस्थांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमानवाडीचे ग्रामस्थ किल्ल्यावरील पाणी वीज नसताना केवळ उताराच्या साहाय्याने पायथ्याशी आणून पिण्यासाठी त्याचा वापर करतात. जिल्ह्यातील भास्करगडसह अन्य काही किल्ल्यांचा विचार केला तर तेथील जलाशय, पाण्याच्या टाक्या, तळी, कुंड यांची स्वच्छता केल्यास मोठय़ा प्रमाणावर जलसाठा ग्रामस्थांना खुला होणार आहे.प्रशासनासह ग्रामस्थांचे या सर्व मूळ नैसर्गिक स्रोताकडे दुर्लक्ष झाले आहे. गड-किल्ल्यांवरील नैसर्गिक स्रोतांचे योग्य नियोजन करत पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पायथ्याशी बंधारे बांधले गेल्यास पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करता येईल. या उपक्रमात लोकसहभाग वाढेल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल आणि दुष्काळावर उत्तम पर्याय सापडणार आहे. यासाठी दुर्गसंवर्धन समिती वनविभाग आणि पुरातत्त्व विभाग यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. किल्ल्यांच्या पायथ्याशी वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांना पाणी नाही, पण बहुतांश किल्ल्यांवर चार गावाची तहान भागेल इतका जलसाठा आहे अशी विचित्र परिस्थिती आहे. किल्ल्यांवरील बहुतांश तळी पर्यटकांनी बुजवली, तर काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. ही स्थिती बदलण्यासाठी दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानने पुढाकार घेत तळी, कुंड, टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र शासकीय विभागाच्या परवानगीशिवाय या ठिकाणी काहीच करता येणार नाही. काही ठिकाणी ग्रामस्थ लोकोत्सव आणि उन्हाळ्यात या पाण्याचा वापर करतात. हा प्रयोग सर्वच ठिकाणी व्हावा यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. - प्रा. आनंद बोरा, राम खुर्दळ दुर्गसंवर्धन प्रतिष्ठान