राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा आरोप मागील नगरपंचायती निवडणुकांमध्ये यश न मिळाल्याने भाजपने निवडणुकीसाठी प्रभाग रचना व नगराध्यक्षांची निवड यात बदल केला असून तो त्यांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. येथील राष्ट्रवादी भवनात रविवारी आयोजित नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरे यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राचा विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असेही तटकरे यांनी नमूद केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहर व जिल्ह्याचा विविध विकासकामे करून कायापालट केला. भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विमानतळ, उड्डाणपूल यांसारखी महत्त्वपूर्ण कामे झाली. नाशिक शहराच्या वाढत्या गुन्हेगारीवर आमदार जाधव यांनी विधान परिषदेत आवाज उठविला. नाशिकच्या परिवर्तनात राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी शहरात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आगामी काळात निवडणुकांसाठी मोठय़ा प्रमाणात युवकांना सामील करून घ्यावे, निष्ठेने काम करणाऱ्या युवकांना निवडणुकीत संधी दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. प्रास्ताविकात पक्षाचे शहराध्यक्ष आमदार जयवंतराव जाधव यांनी समाजातील सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळवू, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी कार्याध्यक्ष छबू नागरे यांनी विविध कामांचा आढावा घेत सूत्रसंचालन केले. माजी शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी आभार मानले. या वेळी आमदार हेमंत टकले, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे आदींसह पदाधिकारी मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते.