नाशिकमधील नांदगाव तालुक्यातील हिंगणे-देहरे येथे एका मनोरूग्णाने केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेतील संशयित रवींद्र पोपट बागुल याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.

नांदगाव तालुक्यातील हिंगणे-देहरे येथे सकाळी आठ वाजेच्या सुमारास मनोरुग्ण असलेल्या रवींद्र पोपट बागुल या माथेफिरूने गावातील विक्रम मांगू पवार (वय ५९), केशव कचरू बागूल (वय ६०) सुभाष भिवाजी बच्छाव (वय ५६) या तिघांवर कुऱ्हाडीने वार केले. यात तिघांचा मृत्यू झाला. रवींद्र बागूल यास पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.