सटाणा तालुक्यातील देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी वेळोवेळी ग्रामसभा घेऊनही प्रशासनाने कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या १५० ते २०० महिलांनी एका दारूच्या दुकानाची तोडफोड करून सदर दुकान जाळून टाकले. दरम्यान, हा जमाव नियंत्रणात आणणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, दुकान चालक व मालक यांच्यावर या महिला तुटून पडल्याने या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यासह चार जण गंभीर जखमी झाले. आज (दि.२२) सकाळी ९ वाजेच्या सुमारास सटाणा जवळील मळगाव या ठिकाणी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सटाणा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मळगाव या गावात अडीच हजार जणांची लोकवस्ती आहे. आरम नदी काठावर गेल्या अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान आहे. या दुकानामुळे या ठिकाणी तळीरामांचा उपद्रव वाढून महिलांची छेडछाड काढण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे येथील महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली होती. हे प्रकार रोखण्यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत याठिकाणी वेळोवेळी ग्रामसभा बोलावून दारू दुकान हटविण्याचा ठराव केला होता. याबाबत प्रशासनाकडे ग्रामस्थांनी अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने येथील १५० ते २०० महिलांनी संतप्त होऊन आज सकाळी लाठ्याकाठ्या घेऊन या दारूच्या दुकानावरच हल्ला चढवला.

dd-dukan_149287544631_650x425

महिलांनी या दुकानाची तोडफोड केल्यानंतर एका तळीरामाने या महिलांना शिवीगाळ करून दारूने भरलेल्या बाटल्या खिशात घालण्याचा प्रयत्न केल्याने जमाव अधिकच भडकला. व संतप्त होऊन या दुकानालाच पेटवून दिले. या दुकानात मोठ्या प्रमाणात दारू साठा असल्याने हे दुकान क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या भीषण आगीमुळे दुकानात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने दुकान जळून खाक झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक बशीर शेख, हवालदार रवींद्र काटकर यांनी जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला असता जमाव त्यांच्यावर तुटून पडला. त्यांनतर या जमावाने आपला मोर्चा दुकानाचे मालक भाऊसाहेब केदा सूर्यवंशी यांच्याकडे वळविला त्यांनाही जमावाने बेदम मारहाण केली. कळवणचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक देविदास पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व इतर पोलीस कर्मचार्यांनी हा जमाव पांगवला.

या प्रकारानंतर संतप्त महिलांनी पुन्हा आपला मोर्चा सटाणा पोलीस ठाण्याकडे वळवला. काही महिलांनी प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करत ताहाराबाद नाक्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. या ठिकाणीही पोलीस यंत्रणेची प्रचंड धावपळ झाली. हा जमाव नियंत्रित होत नसल्यामुळे मालेगाव येथून दंगा नियंत्रकचे दोन पथक या ठिकाणी तत्काळ पोहचले. ताहाराबाद नाक्यावर दंगा नियंत्रक पथक येताच आंदोलनकर्त्या महिलांनी पळ काढला. दरम्यान, महिलांनी दुकान हटविण्याच्या मागणीसाठी तहसीलदार सुनील सैंदाणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सामाजिक कार्यकर्त्या सरोज चंद्रात्रे यांनी या महिलांचे नेतृत्व केले.

deshi-daru-dukan_149287563950_650x425

या देशी दारूच्या दुकानाचे वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज उशिरापर्यंत पोलिसांकडून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या हल्ल्यातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावातील महिलांनी केलेल्या मागणीनुसार सटाण्यातील उत्पादन शुक्ल अधिकाऱ्यांनी याप्रकरणी वेळीच दखल घेत कारवाई केली असती तर हा अनर्थ टळला असता. अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सदर महिलांनी निवेदनातून केली आहे.