केंद्रीय मंत्र्यांसह राज्यमंत्रिमंडळातील सहा मंत्री पनवेल महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलविण्यासाठी पक्षाने केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि अर्धे मंत्रिमंडळ असे अनेक रथी महारथी निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहेत. टाळीसाठी हात पुढे करूनही युतीचा प्रस्ताव मान्य करण्यात न आल्यास युतीविरोधात बोलण्यासाठी भाजपने आशीष शेलार यांची निवड केल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे या निवडणुकीत भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. निवडणुकीला अवघे ३२ दिवस शिल्लक असताना विविध प्रचारसभांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे व अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जयकुमार रावल, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार हे निवडणुकीच्या प्रचारात उतरणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. विकासाचे कार्ड सामान्य मतदारांपर्यंत पोहचविताना भाजपने गेल्या अडीच वर्षांत घेतलेले विविध निर्णय कसे सामान्यांच्या हिताचे ठरले, हे पटवून देण्याचा प्रयत्न या प्रचारसभांत केला जाणार असल्याचे, भाजपच्या सूत्रांनी सांगितले. शिवसेनेतील इच्छुकांच्या आज मुलाखती युतीसंदर्भात अद्याप निर्णय न झाल्यामुळे भाजपला अद्याप स्वतचे उमेदवार जाहीर करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे भाजपच्या गोटातील नेत्यांचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे लागले आहे. शिवसेनेला २२ जागा देण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवल्याने शिवसेनेतील एक गट नाखूश आहे. या गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक १८० शिवसैनिकांच्या मुलाखती शनिवारी होणार आहेत. युतीचा निर्णय उशिरा झाल्यास प्रचारासाठी कमी वेळ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अनेक ठिकाणी स्मार्ट शहरांची संकल्पना राबविली असून ती यशस्वी झाली आहे. पनवेल परिसरालासुद्धा स्मार्ट शहर बनवता येईल. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कारभारातून गतिमान व पारदर्शक सरकारचे प्रतिबिंब सामान्यांना दाखवून दिले आहे. प्रचारातून हेच मुद्दे भाजप मतदारांपर्यंत पोहचवेल. शिवसेनेशी अजूनही युतीची बोलणी सुरूच आहेत. लवकरच निर्णय होईल. - प्रशांत ठाकूर, आमदार