दंड आकारून मालकांना व्यवसाय करण्यास महापालिकेकडून मुभा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच नोडमध्ये परप्रांतीयांनी सुरू केलेले बहुतांश तबेले बेकायदा असल्याची माहिती उजेडात आली आहे. सध्या शहरात ९८ तबले आहेत. त्यापैकी चारच तबेले अधिकृत आहेत. संपूर्ण तबल्यात मिळून दोन हजार १२० जनावरे आहेत. शहरातील बेकायदा तबेल्यांच्या मालकांकडून पालिका केवळ दंडात्मक रक्कम वसूल करीत आहे. हा दंड भरून गायी-म्हशीच्या तबेल्यांचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तबेल्यांची नियमावली तयार करण्याचे अधिकार जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांकडे आहे; ते अधिकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यासाठी आगामी महासभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांतून आलेल्या नागरिकांनी ही तबेले वसवले आहेत. यात सरकारने आगरी कोळ्यांच्या मालकीची संपादित केलेली जमीन तबेले मालकांकडून ताब्यात घेण्यात आली आहे. नवी मुंबई पालिका गरजेपोटी घरे बांधणाऱ्या भूमिपुत्रांना भूमाफिया ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत; परंतु मतांसाठी स्थानिक पुढारी परप्रांतीयांना अभय देत असल्याचे चित्र आहे. बेकायदा तबेल्यांवर गुन्हे दाखल केले जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. बेकायदा तबेल्यातील गायी, म्हशी घोडे आणि बैलांसाठी पालिकेकडून चार हजार रुपये, तर मेंढी आणि बोकडांसाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुजारे यांनी दिली.