द्रोणागिरी नोडमधील बामर लॉरी येथे गुरुवारी झालेल्या अपघातात नितेश जनार्दन भोईर(२३) या तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात आतिष नारायण भोईर व प्रमोद महादेव पंडित हे गंभीर जमखी झाले आहेत. या दोघांना पुढील उपचारांकरिता नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कंटेनर वाहनांच्या कोंडीमुळेच झाल्याचे समजते. हे तीनही तरुण उरण तालुक्यातील मोठी जुई या गावातील आहेत.
हे तिघेजण दुपारी दीडच्या सुमारास मोटरसायकलवरून जात होते. यावेळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नितेश याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीररीत्या जखमी झाले.
त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी जेएनपीटी कामगार वसाहतीतील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात मृत्यू पावलेल्या नितेशला एक लहान मुलगी आहे. द्रोणागिरी नोडमधील या भागात गोदामातील शेकडो कंटेनर वाहने रस्त्यातच उभी राहात असल्याने हलक्या व दुचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे याकडे उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी पोलीस यंत्रणेचे लक्ष वेधले आहे.