रहिवाशांकडून नाराजी व्यक्त; पालिका अतिरिक्त आयुक्तांना निवेदने नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे; मात्र नुकत्याच झालेल्या या उपक्रमांतर्गत एका कार्यक्रमात दिघावासीयांना त्याचा लाभ घेता आला नाही. नगरसेवक नसलेल्या या विभागातील रहिवाशांना सध्या बेकायदा बांधकामे, अस्वच्छता आणि अनारोग्याने विळखा घातला आहे. या समस्या सोडविण्यासाठी आयुक्त येतील, अशी आस लावून बसलेल्या नागरिकांकडे आयुक्तांनी पाठ फिरवली. दिघ्यातील ‘वॉक विथ कमिशनर’च्या कार्यक्रमालाच मुंढे यांना हजर राहता आले नाही. मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’चा वारू पहाटे नेरुळ, कोपरखरणे, ऐरोली, घणसोली आणि वाशी या भागापर्यंत चौखूर उधळला; परंतु ठाणे आणि नवी मुंबईची वेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिघा प्रभागात तो पोहोचू शकला नाही. नवी मुंबई महापालिका हद्दीतील सहा नगरसेवकांचा प्रभाग असणाऱ्या दिघा विभाग कार्यालयाच्या परिक्षेत्राला भेट देण्यासाठी शनिवारी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला आयुक्तांनी दांडी मारली. सकाळपासूनच शेकडो महिलांसह दिघा घर बचाव संघर्ष समिती, दिघा रहिवासी एकता संघ, व्यापारी एकता संघ, दक्ष नागरिक मंच, रिक्षा युनियनचे पदाधिकारी त्याचबरोबर विविध सामाजिक आणि मंडळाचे पदाधिकारी मागण्यांचे निवेदन घेऊन साने गुरुजी बालोद्यानात जमले होते. सकाळी सहा वाजता दिघावासीय आयुक्तांशी संवाद साधण्यासाठी जमले होते. अध्र्या तासानंतर पालिका अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा दिघ्यात येऊन धडकला; पण त्यात आयुक्तांची गाडी नव्हती. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी, काही कारणास्तव आयुक्त या कार्यक्रमाला हजर राहू शकणार नसल्याचे सांगितल्यानंतर रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रमात आयुक्तच नसतील तर हा कार्यक्रमच कशाला हवा, असा सवाल करीत आयुक्त हजर न राहिल्याबद्दल निषेध व्यक्त केला. या वेळी अतिरिक्त आयुक्तांकडे ४५ हून अधिक निवेदने सादर करण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी निवेदनांवर तातडीने कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले.आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंढे यांनी प्रथम दिघा विभाग कार्यालयाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले होते. अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या दिघावासीयांना ऐसपैस रस्ते तयार करून दिले होते. दिघ्यातील तीन नगरसेवकांवर पालिका आयुक्तांनी कारवाई केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी समस्या मांडायच्या कोणाकडे, असा प्रश्न पडला आहे. अनधिकृत बांधकामाचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी तरी आयुक्त येतील अशी अपेक्षा होती. मात्र आयुक्तांनी गैरहजेरी लावून दिघावासीयांना अजूनच चिंतेच्या खाईत लोटले आहे. - संपत शिंदे, स्थानिक नागरिक