गावांसाठी पुनर्वसन समिती स्थापन करण्याची सिडकोची सूचना नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या १० गावांसाठी वाढीव पुनर्वसन पॅकेज दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना ऑक्टोबरनंतर इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी गाव पातळीवर प्रकल्पग्रस्तांचाच समावेश असलेली पुनर्वसन समिती स्थापन करण्याच्या सूचना सिडकोने दिल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांना ऑक्टोबरपासूनचे भाडे मिळणार असले तरी हे प्रकल्पग्रस्त दसरा, दिवाळीनंतरच टप्प्याटप्प्याने स्थलांतर करणार असल्याचे समजते. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात पनवेल तालुक्यातील १० गावे विस्थापित होणार आहेत. त्यांना पाच वर्षांपूर्वी सिडकोने सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले होते, पण प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्या प्रलंबित होत्या. यात पती-पत्नीच्या नावावर असलेल्या सर्व घरांना पर्यायी घर म्हणून केवळ एकच घर देण्याचा अंतर्भाव होता. त्याचप्रमाणे २०१३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात २२३ घरे आढळली नव्हती पण ती प्रत्यक्षात होती. त्यामुळे त्यांना पर्यायी घरे देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या वाढीव पॅकेजमध्ये घेण्यात आला. त्याचबरोबर नवीन ठिकाणी घर बांधण्यासाठी वाढीव बांधकाम खर्च देण्याचाही निर्णय होण्याची चिन्हे आहेत. या सर्व निर्णयांची प्रकल्पग्रस्तांना माहिती असावी आणि प्रकल्पग्रस्तांनी ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्याने घरे रिकामी करावीत, यासाठी गाव पातळीवर प्रकल्पग्रस्तांचाच समावेश असलेल्या समित्या स्थापन करण्याचे निर्देश सिडकोने दिले आहेत. याच काळात सिडको संघर्ष समित्यांबरोबरदेखील चर्चा करणार आहे. या वाढीव पॅकेज निर्णयाचा अध्यादेश अद्याप निघालेला नाही. तो निघाल्यानंतर कामाला गती येणार आहे, मात्र प्रकल्पग्रस्त परांपरागत गावात दसरा दिवाळी झाल्यानंतर गावे सोडणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. स्थलांतरला नवीन वर्ष उगविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पारगाव, डुंगी गावांचेही स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. १० गावांच्या स्थलांतरानंतर या दोन गावांना कोणी वाली राहणार नाही, अशी भीती तेथील ग्रामस्थांना आहे. १० गावांसाठी १० पुनर्वसन समित्या स्थापन करण्याच्या सूचना सिडको अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांचा समावेश असलेल्या या समित्यांना सिडकोच्या सर्व निर्णयांची माहिती दिली जाणार आहे. मात्र स्थलांतर दसरा, दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. आमच्या गावात ही शेवटची दिवाळी साजरी करणार आहोत. - महेंद्र पाटील, अध्यक्ष, विमानतळ शेतकरी संघर्ष समिती, नवी मुंबई