उरण परिसरात पावसाने पुन्हा जोर धरल्याने सुक्या पेरणीला जीवदान मिळाले आहे. पिकांना अंकुरही फुटल्याने यंदा चांगल्या पिकाची आशा शेतकऱ्यांमध्ये फुलली आहे. यंदा लावणीची ८० टक्क्य़ांपर्यंतची कामे पूर्ण झाली आहेत. उरण पश्चिम विभागात केगाव, नागाव आणि चाणजे भागात शेतीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. ३० वर्षांपूर्वी जेएनपीटी आणि भेंडखळ परिसरातील भूसंपादनानंतर शेतजमीन नष्ट करण्यात आली होती; मात्र काही शेतकऱ्यांनी करळ, जसखार, रांजणपाडा परिसरात भातशेती निर्माण केली आहे. तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर जमिनीवर भाताचे पीक घेतले जात आहे. यापैकी ८० टक्केपेक्षा अधिक लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. तर जुलैच्या अखेपर्यंत लावणीचे काम पूर्ण होईल अशी माहिती उरणचे तालुका कृषी अधिकारी के. एस. वसावे यांनी दिली.